नवी दिल्ली – भारतीय सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) बांगलादेशी तस्करांच्या घुसखोरीचा डाव हाणून पडला. त्या कारवाईवेळी तस्करांनी बीएसएफच्या गस्ती पथकावर हल्ला केला. त्याला बीएसएफ जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरात दोन तस्कर ठार झाले. ती घटना रविवारी पहाटेच्या सुमारास पश्चिम बंगालच्या कूचबिहार जिल्ह्यात घडली.
बांगलादेशी तस्करांच्या गटाने भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याचे गस्त घालणाऱ्या बीएसएफ जवानांना आढळले. तस्करांना हटकल्यावर त्यांनी जवानांना वेढले. जवळपास 20 च्या संख्येने असणाऱ्या तस्करांनी जवानांवर हल्ला केला. त्यामध्ये काही जवान जखमी झाले. जीवितास धोका असल्याने आणि कुठलाही पर्याय न उरल्याने जवानांनी गोळीबार केला.
त्यामुळे तस्करांनी माघारी बांगलादेशच्या हद्दीत पलायन केले. काही काळानंतर जवानांनी घटनास्थळी शोधमोहीम राबवली. त्यावेळी दोन तस्करांचे मृतदेह आढळले. दरम्यान, तस्करांच्या घुसखोरीची माहिती बांगलादेशच्या सीमा सुरक्षा दलाला (बीजीबी) देण्यात आली. बांगलादेशी तस्करांनी गस्ती पथकावर हल्ला केल्याबद्दल बीएसएफने बीजीबीकडे तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. बांगलादेशलगतच्या सीमेच्या रक्षणाची जबाबदारी भारताकडून बीएसएफवर सोपवण्यात आली आहे.