दुचाकी पेटवली
भर वस्तीत घुसून बेछूट गोळीबार; पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
कराड – शहरातील बुधवार पेठेत मध्यरात्री पवन सोळवंडेचा खून झाला आणि कराड शहर हादरून गेले. शांततेसाठी प्रयत्न करणाऱ्या कराडकरांच्या मनाचा थरकाप उडाला. गुन्हेगारी टोळ्यांच्या वर्चस्ववादातून हा खून झाला. या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आगामी काळात या टोळ्यांना लगाम घालण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.
कराडमध्ये 2009 पासून वर्चस्ववाद मोठ्या प्रमाणावर उफाळून आला. वर्चस्ववादातून गोळ्या घालून होणारे खून कराडच्या शांततेसाठी धोकादायक ठरत आहे. मंगळवारी मध्यरात्री पाऊणच्या सुमारास भरवस्तीत शिरून पोलिसांच्या रेकॉर्डवरील संशयिताचा गोळ्या घालून निर्घृणपणे झाला. त्यामागे टोळीसदृश्य गुंडगिरी आणि वर्चस्ववाद असण्याची दाट शक्यता आहे. यामुळे येणाऱ्या काळात वर्चस्ववादाला आणखीन हवा मिळण्याची शक्यता आहे. हा काळ पोलिसांसाठी अत्यंत जोखमीचा असून या टोळ्यांवर जरब बसवणे गरजेचे बनले आहे.
पवन सोळवंडेचा खून व त्याच्या विरोधातील टोळ्यांच्या कारवाया वेळीच न रोखल्याने त्यांची गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढली आहे. नव्वदच्या दशकानंतर हळूहळू वर्चस्ववाद सुरू झाला. लाठ्याकाठ्यांनी होणारी भांडणे पिस्तुलधारी टोळ्यांमध्ये विभागली गेली. गुन्हेगारी जगतात सध्या जात-पात, वंश न पाहता फक्त वर्चस्ववाद पाहिला जात आहे. नव्वदीच्या दशकातील जातीय दंगली सावरल्यानंतर कराडकर शांततेची प्रार्थना करत होते. मात्र, जानेवारी 2009 मध्ये महाराष्ट्र केसरी संजय पाटील यांचा भर चौकात दिवसाढवळ्या गोळ्या घालून खून झाला. त्यानंतर मात्र कराडच्या गुन्हेगारीला पिस्तूलची सवय लागली.
हा खूनही वर्चस्ववादातूनच झाला होता. त्यानंतर काही दिवसांनी सल्या चेप्यावर कोर्टाच्या आवारात दोन वेळा हल्ला झाला. दुसऱ्या वेळी झालेल्या हल्ल्यात तो जायबंदी झाला आणि काही महिन्यांनी त्याचा मृत्यू झाला. मात्र, तो जेव्हा जायबंदी झाला होता, त्यावेळी त्याने आपल्यावर झालेल्या गोळीबाराचा बदला घेण्यासाठी कट रचला. त्यात कराडमधील बबलू माने यांच्यावर भरदिवसा गोळीबार झाला. यावेळी बबलू मानेवर गोळीबार करणाऱ्याला जमावाने ठेचून मारले. यावेळी तिसऱ्यांदा कराड दुहेरी खुनाने हादरले.
अधूनमधून टोळीयुद्ध एका बाजूला वाढत असताना पोलिसांनी मात्र यांच्यावर अपेक्षित अशी जरब बसवली नाही. त्यामुळेच मध्यरात्री भरवस्तीत पुन्हा एकदा झालेल्या बेछूट गोळीबारीने कराड शहर हादरून गेले. कराडकरांच्या मनाचा थरकाप उडवणाही घटना बुधवार पेठेत मध्यरात्री घडली. हे सर्व अचानक झाले नाही. तर यातही गेम करण्याआधीच फिल्डिंग लावल्याचे समोर येत आहे. या प्रकरणात गुन्हेगारांच्या हालचालींची माहिती ठेवण्यात पोलिसांना सपशेल अपयश आले आहे. त्यांच्या हालचालीकडे पोलिसांनी आवश्यक लक्ष न दिल्याने हा खून झाल्याचे बोलले जात आहे.
टोळीयुद्ध पुन्हा भडकले
पवन सोळवंडेचा मध्यरात्री पाऊणच्या सुमारास गोळ्या घालून खून करण्यात आला. ही बातमी पहाटेपासून सोशल मीडियावरुन लोकांपर्यंत पोहचत होती. त्यामुळे कराडमध्ये तणावपूर्ण शांतता निर्माण झाली होती. व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली होती. ग्रामीण भागातील लोकही दररोजच्या प्रमाणे शहरात न आल्याने येथे दिवसभर शुकशुकाट होता.
टोळ्यांना लगाम घालण्याचे आव्हान
मंगळवारी मध्यरात्री घडलेल्या सोळंवडे खून प्रकरणानंतर शहरात तणावाचे वातावरण होते. पवनचा खून झाल्यानंतर त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कराडच्या वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. यावेळी रुग्णालय परिसरात त्याच्या नातेवाईकांसह समर्थकांनी गर्दी केली होती. बुधवारी सकाळी या घटनेचे शहरात पडसाद उमटले. सर्वत्र तणावाचे वातावरण तयार झाल्याने व्यापाऱ्यांनी बाजारपेठेतील दुकाने बंद ठेवली. तर महाविद्यालय परिसरात काही युवकांकडून दहशत माजवित दुकाने बंद करण्यात आली. दरम्यान, दुपारी सोळवंडे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर त्याच्या घरी आणला. यानंतर शहरातील बाजारपेठेतील व्यवहार पूर्ववत सुरु झाले.
कराड बाजारपेठ बंद
अतिसंवेदनशील ठिकाण म्हणून कराडची वेगळी ओळख आहे. मात्र, अशांत कराड शांत होत असतानाच पुन्हा एकदा टोळी युद्धाचा भडका उडाल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री झालेल्या खून प्रकरणावरुन दिसून येत आहे. अद्यापही शहरासह परिसरात दहशत माजविणारी गुंड प्रवृत्तीची मंडळी स्वैरपणे वावरत आहेत. शस्त्रांचा खुलेआम वापर केला जात असल्याच्या घटनाही वारंवार होत असून यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था भंग होऊ लागली आहे. हे सर्व थांबविण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
दिवसभर शुकशुकाट
पवनचा खून झाल्याच्या घटनेनंतर काही वेळातच रात्री एक वाजण्याच्या सुमारास येथील चर्चसमोर अज्ञात जमावाने दुचाकी पेटवून दिली. घटनास्थळी अग्निशमन दलाची गाडी आल्यानंतर पेटलेली गाडी विझवण्यात आली. स्टॅंड परिसरातील एका रिक्षाचेदेखील नुकसान करण्यात आले. दुचाकी नेमकी कोणी पेटवली, हे अद्यापपर्यंत समोर आलेले नाही. याचाही पोलीस शोध घेत आहेत.