दोन संशयितांना अटक; रेठरे कॉलनी येथील घटना
कराड – रेठरे कॉलनी (ता. कराड) येथे भाचीबरोबर असलेल्या प्रेमसंबंधाच्या कारणावरुन चिडून जाऊन दोघांनी भावकीतील युवकाचा लाकडी दांडक्याने मारहाण करून निर्घृण खून केला. ही घटना बुधवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. अनिकेत राजेश रसाळ (वय 24 रा. कार्वे, ता. कराड) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबतची फिर्याद अभिकांत राजेश रसाळ (वय 29 रा. कार्वे) यांनी ग्रामीण पोलिसात दिली आहे. याप्रकरणी जयदीप शंकर रसाळ, रविराज शंकर रसाळ (दोघेही मूळ रा. कार्वे, सध्या रा. रेठरे कॉलनी ता. कराड) यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता सहा दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले, अनिकेत रसाळ त्याचा भाऊ अभिकांत बरोबर सेंट्रिंग काम करायचा. अनिकेतचे व जयदीप रसाळ याच्या भाचीचे प्रेमसंबंध होते. जयदीप व रविराज मूळचे राहणारे कार्वे येथीलच परंतु कामानिमित्त ते रेठरे कॉलनी येथे राहत होते.
अनिकेतचे आणि जयदीप व राज रसाळ यांची भाचीबरोबर असलेल्या प्रेमसंबंधाच्या कारणावरून बरेच वेळा वादावादीही झाली होती. मंगळवारी जयदीप रसाळ याच्या भाचीचे लग्न झाले होते. त्यावेळी अनिकेत हा बुधवारी रेठरे कॉलनी येथे गेला होता. त्यावेळी जयदीप रसाळ व रविराज रसाळ या दोघांनी भाचीबरोबर असलेल्या प्रेमसंबंधाच्या रागातून अनिकेत यास घराच्या पाठीमागील बाजूस घेऊन जाऊन त्याला लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांडक्याने गंभीर मारहाण करून त्याचा निर्घृण खून केला.
घटनास्थळी पोलीस उपअधिक्षक नवनाथ ढवळे, पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी भेट दिली. याप्रकरणी कराड तालुका पोलिसांनी जयदीप रसाळ व रविराज रसाळ या दोघांना अटक केली असून त्यांना न्यायालयाने सहा दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.