राज्य रस्ते विकास महामंडळाचा निर्णय
लोणावळा – पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहतुकीसाठी अडसर ठरणारा खंडाळा-बोरघाटातील 189 वर्षे जुना ब्रिटिशकालीन अमृतांजन पूल पडण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून घेण्यात आला आहे. 14 एप्रिल पर्यंत ही कार्यवाही पूर्ण करण्यात येणार असल्याचेही महामंडळाने स्पष्ट केले आहे.
अमृतांजन पूल पडण्याच्या हालचाली “एमएसआरडीसी’ने 2017 पासूनच सुरू केल्या होत्या. मात्र, द्रुतगती मार्गावर असलेल्या वाहनांच्या प्रचंड संख्येमुळे हे शक्य होत नव्हते. परंतु, सध्या संचारबंदीमुळे या मार्गावर वाहतूक अत्यंत तुरळक आहे. यामुळे 14 एप्रिल दरम्यान, हा पूल पाडण्यात येणार आहे.
या कालावधी दरम्यान पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरुन पुणे बाजुला जाणारी वाहतूक 44 कि.मी. अंडा पॉइंट येथून खंडाळा व लोणावळा शहरातून बाहेर काढण्यात येणार आहे, तर मुंबई दिशेकडे जाणारी वाहतूक 55 कि.मी. लोणावळा एक्झिट येथून खाली उतरवत लोणावळा व खंडाळा शहरातून अंडा पॉइंट येथे द्रुतगती मार्गाला जोडण्यात येणार आहे, असे महामंडळाने नमूद केले आहे.