कोपरगाव – विरोधी पक्षाचे आमदार असताना माजी आमदार अशोकराव काळे यांनी गोदावरी नदीवर विविध ठिकाणी पूल बांधून दळणवळणाचा प्रश्न सोडविला. मात्र गेल्या 5 वर्षात अशोकराव काळे यांनी बांधलेल्या पुलाच्या दोन्ही बाजूला तालुक्याच्या आमदार साधा भराव टाकू शकल्या नाही.
यावरून त्यांना विकासाची किती आवड होती, हे स्पष्ट होते अशी टीका कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार आशुतोष काळे यांनी केली. तालुक्यातील चासनळी येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून आमदार सपशेल अपयशी ठरल्या आहेत. ज्यांच्या पक्षाचे सरकार राज्यात व देशात होते त्यांच्याकडून तालुक्याच्या जनतेला मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र या अपेक्षा फोल ठरल्या आहेत.
त्यामुळे ज्या भागात गेलो त्या ठिकाणचे भाजपचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करीत आहे. चासनळी व परिसरातील शेतकऱ्यांचे भवितव्य अवलंबून असलेला मंजूर बंधारा 2016 ला गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे वाहून गेला होता. त्यावेळी शेतकऱ्यांच्या जमिनी व विहिरी या बंधाऱ्यात वाहून गेल्या होत्या.
यावर्षी आलेल्या महापुरातही हा बंधारा पुन्हा वाहून गेला. या मंजूर बंधाऱ्याची डागडुजी व देखभाल करण्याचे काम तालुक्याच्या आमदारांकडे आहे. 2016 मध्ये या मंजूर बंधाऱ्याची जर चांगल्या प्रकारे दुरुस्ती केली असती तर हा बंधारा पुन्हा वाहून गेला नसता, पण त्यांनी त्यावेळी या बंधाऱ्याची तात्पुरती डागडुजी केल्यामुळे मंजूर बंधारा पुन्हा वाहून गेला. यास आमदार जबाबदार आहेत. अशा कर्तव्यशून्य आमदारांना 21 तारखेला त्यांची जागा दाखवून द्या, असे आवाहन काळे यांनी मतदारांना केले.