वाईच्या वाहतुकीची मदार ब्रिटिशकालीन पुलावर
शहराला जोडणाऱ्या पुलाला झुडपांचे ग्रहण
वाई – वाई शहराच्या उत्तर दक्षिण भागास जोडणारा मुख्य पूल म्हणून ज्याची ओळख आहे असा किसन वीर या मुख्य चौकास जोडणारा ब्रिटिशकालीन पूल आहे. या पुलाला शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्यास उपयोगी पडेल असा पर्यायी दुसरा पूल अजुनही कृष्णा नदीवर तयार करण्यात आला नाही.
वाई शहरात फुलेनगरमार्गे प्रवेश करीत असताना रविवार पेठेला जोडणारा किवरे ओढ्यावरील पुलही ब्रिटिशकालीन असून त्यावरही झुडपांचे साम्राज्य झाले आहे. अलीकडे पंचवीस वर्षापूर्वी महागणपती घाटाला जोडणारा नवीन पूल तयार करण्यात आला आहे. परंतु त्यांची उंची कमी असल्याने नदीला पूर आल्यानंतर त्याच्यावरील वाहतूक बंद करावी लागते.
किसन वीर चौकाला जोडणारा कृष्णा नदीवरील बांधण्यात आलेला मुख्य पूल 1884 साली ब्रिटिशांच्या राजवटीत बांधण्यात आला आहे. या पुलाला 133 वर्षे पूर्ण झाली आहेत. दरम्यान पुलाला शंभर वर्षे पूर्ण झाल्यानंतर 1984 साली ब्रिटिश शासनाने महाराष्ट्र शासन व नगरपालिका यांना पुलाची मुदत संपल्याच्या बाबतीत पत्र पाठविण्यात आले असून शासनाच्यावतीने कोणत्याही प्रकारची पावले यासाठी उचलण्यात आली नाहीत. या पुलावर मोठ्या प्रमाणावर झाडे-झुडपे उगवली आहेत. पालिका प्रशासनाच्या माध्यमातून दर चार महिन्यातून पुलावरील वाढलेली झुडपे काढण्याचे काम केले जाते. दरम्यान, वाई शहराची वाहतुकीची वाढलेली मागणी पाहता सक्षम पुलांची बांधणी शासनाने करावी अशी मागणी नागकिांमध्ये होत आहे.
कृष्णा नदीवरील व फुलेनगरला जोडणाऱ्या पुलावर वाढलेली झुडपे काढण्याचा ठेका दिला असून लवकरच ती काढण्यात येणार असून तज्ज्ञांच्या सल्ल्याने झुडपांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येणार आहे.
– विद्या पोळ मुख्याधिकारी, वाई नगरपालिका