पद्मावती ते भारती विद्यापीठ मार्गावरील व्यथा
पूल संपताच उतारावर वाहतूक सिग्नलने स्वागत
आता रस्ता नव्हे, उड्डाणपूल होतोय जाम
पुणे/कात्रज – स्वारगेट ते कात्रज मार्गावरील वाहतूक कोंडी सुटावी, म्हणून पद्मावती ते भारती विद्यापीठ यादरम्यान उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. या पुलामुळे वाहतूक सुरळीत झाली असली तरी ज्याठिकाणी उड्डाणपूल संपतो, त्याठिकाणी मात्र वाहनचालकांना पुन्हा कोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळे उड्डाणपूल उभारून ही वाहतूक सुरळीत झाली, असे चित्र काही केल्या दिसत नाही.
सततची वाहतूक कोंडी लक्षात घेऊन स्वारगेटपासून रस्ता रुंदीकरण करण्यात आले आहे, पण पद्मावती ते भारती विद्यापीठादरम्यान रस्त्यालगतच्या इमारतींमुळे या रस्त्याचे रुंदीकरण कठीण होते. त्यामुळे येथे उड्डाणपूल उभारुन वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा प्रयत्न काही प्रमाणात यशस्वी झाला असला, तरी मूळ प्रश्न काही सुटलेला नाही. पूर्वी रस्त्यावर कोंडीमुळे सर्वच वाहने अडकून पडायची आणि वाहनांच्या दूरवर रांगा दिसायच्या. आता त्याऐवजी उड्डाणपूलच जाम होतो.
प्रत्यक्षात ज्यावेळी हा उड्डाणपूल उभारणे सुरू होते, त्यावेळी तो शंकर महाराज मठ ते भारती विद्यापीठ मुख्य प्रवेशद्वारापर्यंत जाणार होता. पण, मठात येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी उड्डाणपूल आराखड्यात थोडा बदल केला गेला आणि तो पद्मावतीपर्यंत वाढवण्यात आला, तर दुसरीकडे भारती विद्यापीठाऐवजी थोडा अलीकडे हा पूल उतरवण्यात आला. आता जेथे उड्डाणपूल उतरतो तेथे रस्ता अचानक अरुंद होतो. त्यामुळे उड्डाणपूलावरून आणि खालून येणारी वाहने एकत्र येतात, तेथेच नेमका रस्ता अरुंद आहे.
याठिकाणी वाहतूक कोंडी होण्याचे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे, उड्डाणपूल संपतो आणि तीव्र चढ सुरू होतो. त्यामुळे एकदम वाहनांच्या वेगाला ब्रेक लागतो.
त्यातून बस किंवा ट्रकसारखी वाहने तर तीव्र चढावरुन जाताना फारच हळू जातात त्यामुळे मग मागे वाहनांची रांग लागते. हा प्रकार दररोज असतो. त्यामुळे उड्डाणपुलाच्या दुसऱ्या बाजूला म्हणजे पद्मावती येथील सिग्नलमुळे कोंडी होते, पण पुढे रस्ता रुंद असल्याने फारशी अडचण येत नाही.
नागरिकांचा आरोप काय?
या उड्डाणपुलाच्या मूळ आराखड्यानुसार जर तो भारती विद्यापीठ मुख्य प्रवेशद्वाराजवळ उतरवला असता, तर वाहतूक कोंडी झाली नसती. असे या परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. भारती विद्यापीठाच्या येथे रस्त्याचे रुंदीकरण होऊन रस्ता मोठा झाला आहे त्यामुळे वाहने सरळ निघून गेली असती. राजकीय दबावामुळे अंतर कमी केले असले तरी त्याचा फटका मात्र नागरिकांना बसत आहे.