गुवाहटी – आसाम राज्यातील करीमगंज जिल्ह्यात सोमवारी एक दुर्घटना घडली. राताबारी विधानसभा क्षेत्रात नदीवरील लटकता पूल तुटल्याने 30 शाळकरी विद्यार्थी जखमी झाले आहेत. शाळेतून घरी जाताना विद्यार्थी नदीवरील पूल पार करत असताना पूल तुटला आणि विद्यार्थी नदीत कोसळले.
पूल तुटला त्यावेळी विद्यार्थी घरी परत जात होते. आसाममधील सिंगला नदीवर बांधण्यात आलेला लटकता पूल चेरागी आणि राताबारीतील इतर भागांना जोडणारा एकमेव पूल होता. गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थी आणि इतर नागरीक या पुलांचा वापर करत होते.
सोमवारी चेरागी विद्यापीठ हायस्कूलचे विद्यार्थी पुलावरुन सिंगला नदी पार करत होते. यावेळी नेमका पूल तुटला आणि विद्यार्थी नदीत कोसळले आणि जखमी झाले. ही घटना घडली त्यावेळी आजूबाजूच्या नागरिकांनी सतर्कता दाखवत विद्यार्थ्यांना वाचवले. जखमी विद्यार्थ्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार तीन वर्षांपूर्वी या पुलाची निर्मिती करण्यात आली होती.
गेल्याच आठवड्यात आसामची राजधानी गुवाहटीमध्ये पांडू घाट परिसरात ब्रह्मपुत्रा नदीत बुडाल्याने तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. हे विद्यार्थी ट्युशनवरुन परतत होते. यावेळी त्यांना पोहण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनी नदीत उड्या मारल्या आणि बुडून त्यांचा मृत्यू झाला.