नगर -सरकारने लॉकडाऊनमध्ये घालून दिलेल्या अटी व शर्तींचे पालन करुन पन्नास व्यक्तींच्या उपस्थितीत मंगलकार्यालयात विवाह सोहळा करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे वधू व वर पित्यांचा जीव भांड्यात पडला आहे. फिजिकल डिस्टन्ससह अन्य अटी, शर्तींवर हॉटेल किंवा सभागृहात लग्नाची परवानगी मिळावी, यासाठी स्थनिक मंगल कार्यालये, हॉटेल, सांस्कृतिक हॉल चालकांनी जिल्हा प्रशासनाकडे मागणी केली होती. याबाबत दैनिन प्रभातने वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत शासनाने परवानगी दिली आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्रच लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यात अनेकांनी शासनाच्या अटी, शर्ती पाळात लॉकडाऊन काळातच बांशिंग बांधले, तर काही हौशींनी लग्न एकदाच होते असते, म्हणत ते पुढे ढकलले. परंतु लॉकडाऊनचा कालावधी वाढत असल्याने तसेच मंगलकार्यालयेही बंदी असल्याने अनेक वधू-वर पित्यांची जागे अभावी पंचाईत झाली होती. त्यात लग्न छोटे करण्याचा निर्णय घेतला. मात्र करायचे कुठे, हा मोठा प्रश्न उभा ठाकला होता. तथापि, कोणतेही मंगल कार्यालय अथवा सांस्कृतिक हॉल त्यांची बुकिंग घेत नव्हते. त्यातून त्यांचा घोर वाढला होता. या गोंधळलेल्या स्थितीत शासनाने काही अटी, शर्तींच्या आधिन राहून मंगलकार्यालये खुली करण्यास परवानगी दिली आहे.
नगरसारख्या शहरात चाळीत राहणाऱ्या कुटुंबांनी कुठे विवाह सोहळे करावेत, असा प्रश्न होता. गल्लीत लग्नसोहळा करण्याचा प्रयत्न केल्यास तेथे फिजिकल डिस्टन्स कसे पाळायचे? असा पेच होता. अनेक कुटुंब तीन किंवा चार खोल्यांच्या प्लॅटमध्ये राहतात. इतक्या कमी जागेत फिजिकल डिस्टन्स कसे पाळायचे? असा त्यांच्यापुढे प्रश्न होता. त्यामुळे अनेक ठरलेले विवाह सोहळे अडकून पडले होते. दरम्यान, फिजिकल डिस्टन्ससह अन्य अटी, शर्तींवर हॉटेल किंवा सभागृहात लग्नाची परवानगी मिळावी, यासाठी स्थनिक मंगल कार्यालये, हॉटेल, सांस्कृतिक हॉलचालकांनी जिल्हा प्रशासनाकडे मागणी केली होती. याबाबत दैनिन प्रभातने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल शासनाकडून घेण्यात आली असून, मोजक्याच व्यक्तींच्या उपस्थितीत लग्न सोहळ्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच शासनाने सेतू कार्यालयेही सुरू करण्यास परवानगी दिली आहे.
शहरासह जिल्ह्यात धुवॉंधार पाऊस
भिंगार या परिसरात काही ठिकाणी तुरळक, तर काही ठिकाणी धुवॉंधार पावसाच्या सरी बरसल्या आहेत. तसेच शहरातील पाईपलाईन, एकवीरा चौक, प्रोफेसर चौक, गुलमोहर रस्ता परिसरात भाजीविक्रेत्यांची तारांबळ उडाली. ग्रामीण भागातील काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडे कोसळली आहेत. वादळी वारा आणि झाडांच्या फांद्या पडल्याने शहरात वीजपुरवठा खंडीत झाला होता. जिल्ह्यातही अनेक भागास वादळी वाऱ्याचा तडाखा बसला. अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. मात्र, खरिपाच्या पेरणीसाठी मान्सूनपूर्व पाऊस उपयुक्त असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.