जळगाव – लग्नानंतर दागिने, रोकड घेऊन फरार झालेल्या नववधूला तिच्या साथीदारांसह पोलिसांनी अटक केली आहे. कलीता उर्फ लक्ष्मी किराडा (रा. मोहमांडळी-खरगोन), सुरेश आर्य (रा. सोनवळ, सेंधवा), अनील धास्त (रा. मोहमांडळी-खरगोन), हाकसिंग पावरा (रा. हेद्रयापाडा-शिरपूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाह होत नसल्याने एका 27 वर्षीय युवकाने आपल्या परिचयातील पळसपूर (ता. शिरपूर) येथील व्यक्तीशी संपर्क साधून लग्नासाठी आरोपी सुरेश यांच्याशी बोलणे केले. दलालांमार्फत मध्यस्थी झाल्यानंतर ठरल्याप्रमाणे वधूस 1लाख 60हजार रुपये, दागिने, साडी असा ऐवज देऊन लग्न लावण्यात आले. मात्र विवाहानंतर दुसऱ्याच दिवशी वधून वरील सर्व ऐवज आणि नवरदेवाच्या घरातील कपाटातील 25 हजार रुपये इतर दागिने घेऊन वधू फरार झाली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नवरदेवासह कुटुंबीयांनी पिंपळगाव हरेश्वर पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
तक्रार दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून वधूसह तिच्या तीन साथिदारांना अटक केली आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.