संगमनेर – विवाहासाठी वयाचे कुठलेही बंधन नाही हे 80 वर्षांचा वर व 68 वर्षांची वधू विवाहबंधनात बांधले गेल्याने पुन्हा सिद्ध झाले आहे. सिन्नर (जि. नाशिक) येथील निवृत्ती रुपवते व सुमनबाई पवार (ता. संगमनेर) हे नुकतेच विवाहबंधनात अडकले. सिन्नर येथे पार पडलेल्या या विवाह सोहळ्यास मोठ्या संख्येने वऱ्हाडी उपस्थित होते.
सिन्नर तालुक्यात हिवरे या गावी बुद्ध विहारात ज्येष्ठांचा हा विवाहसोहळा नुकताच संपन्न झाला. पोस्ट मास्तर म्हणून निवृत्त झालेले 80 वर्षांचे निवृत्ती रूपवते यांनी संगमनेर येथील 68 वर्षांच्या सुमनबाई पवार यांच्याशी विवाह केला.
दोघांनी आयुष्याच्या सायंकाळी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आणि सर्वांच्या सहमतीने हा विवाहसोहळा अगदी थाटात पार पडला. रूपवते यांना एक मुलगा आहे. मात्र दहा वर्षांपासून तो बेपत्ता आहे, तर सुमनबाई यांना दोन मुली. आयुष्याच्या उतार वयात दोघे एकटे असल्याने ओळखीच्या लोकांनी चर्चा घडवून आणली आणि 16 फेब्रुवारीला हा विवाहसोहळा पार पडला. हा विवाह सोहळा जुळवून आणण्यात सुमनबाई यांचे पुतणे चंद्रकांत पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. केवळ पुढारलेले विचार न करता ते वास्तवात आणण गरजेचे असल्याच पवार यांनी सांगितले.
या विवाहसोहळ्याला सुमनबाई यांच्या दोन्ही मुली, तसेच नातेवाईकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. लग्नाला कायदेशीर मान्यता मिळावी, यासाठी निमंत्रणपत्रिका सुद्धा छापण्यात आल्या होत्या. उतारवयात वृद्धाश्रमामध्ये एकटे जीवन व्यतीत करण्यापेक्षा असे पुनरर्विवाह ही काळाची गरज बनत चालले आहेत. अशा विवाह सोहळ्यांमुळे बुरसटलेल्या विचारांना तिलांजली मिळेल, असे या निमित्ताने म्हणता येईल.