वीसगाव खोरे – शेतकरी धर्माला साजेशा अस्सल पारंपरिक पद्धतीने उत्रौलीतील वधू कोमल सजविलेल्या बैलगाडीतून लग्न स्थळी पोहचली. यावेळी बैलजोडीच्या पायात तोडे, कपाळावर बाशिंग, गळ्यात घुंगराच्या माळा, चंगाळ, शिंगांना हिंगुळ, बेघड, टोकावर शेंब्या, कपाळावर गोंडे (धारक्या), डाव्या बाजूच्या पुढील पायात दृष्ट लागू नये म्हणून काळा दोरा, अंगावर झुल, फूगे, रिबिन असा साज चढवला होता. फुलं, पानांनी सजविलेल्या या बैलगाडीतून नऊवारी साडी, नथ अशा पारंपरिक वेशात आणि कासरा हातात घेऊन बैलगाडीचे सारथ्य करीत कोमल विवाहस्थळी आली आणि ग्रामीण भागात हा एक कौतुकाचा विषय झाला.
उत्रौली (ता. भोर) येथील प्रगतशील शेतकरी दिलीप हरीभाऊ शेटे यांची कन्या कोमल आणि वीर येथील जयवंत दत्तात्रय समगीर यांचे चिरंजीव अविनाश यांच्या विवाहनिमित्त हा आगळावेगळा वऱ्हाडी थाट केला होता. यावेळी ध्वनी प्रदूषण, हवा प्रदूषण टाळणे, पर्यावरण संतुलन राखणे याबाबत वऱ्हाडी मंडळींकडून जनजागृती करण्यात आली. अकलीकडच्या काळात सोळा संस्कारातील एक महत्त्वाचा संस्कार असलेल्या लग्न सोहळ्याचे स्वरूप बदलेले असून हा सोहळा एक “इव्हेंट’ झाला आहे. यामध्ये वधु-वरासाठी फुलांनी आकर्षक सजवलेली कार, बॅंड आणि डीजेचा कर्कश्श आवाज, वऱ्हाडी मंडळींचा डान्स असं पाहायला मिळते. लग्न हा संस्कार न राहता प्रतिष्ठेचे प्रदर्शन करण्याचे साधन झाले आहे.
“सध्या पेट्रोल, डिझेल व गॅसचे दर वाढत आहेत. याचा फटका शेती व्यवसायाला मोठ्या प्रमाणात बसत असून प्रवासी भाडे देखील महागले आहे. इंधनाचे दर स्थीर व्हावेत या करीता पारंपरिक पद्धतीने बैलगाडीचा वापर करुन लग्न स्थळी पोहचलो.”
कोमल शेटे – वधू
अविनाश समगीर – वर