वाई – मेणवली, ता. वाई येथील धोम डाव्या कालव्यावरील वाघजाईनगर वस्तीला जोडणाऱ्या पुलावरून रविवार रात्री दहाच्या सुमारास जेसीबी गेल्याने आधीच मोडकळीस आलेला पुल कोसळला. रात्रीची वेळ असल्याने व जेसीबी पूल ओलांडून पुढे गेल्यानंतर पूल कोसळल्याने कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही. पंधरा दिवसांपूर्वी पुलाचा काही भाग कोसळल्याने मेणवली ग्रामस्थ, परिसरातील नागरिकांनी धोम पाटबंधारे खात्याला तशा आशयाचे निवेदन दिले होते.
त्या अनुषंगाने आ. मकरंद पाटील यांनी पुलाची पाहणी करून संबंधित विभागाला तशा सूचना दिल्या होत्या. परंतु पाटंबधारे खात्याने कोणतीही दखल न घेतल्याने ही घटना घडली आहे. त्यामुळे वाघजाईनगरमधील सुमारे वीस कुटुंबांचा रहदारीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच मेणवली गावातील शेतकऱ्यांना या परिसरात जाण्या-येण्यासाठी एकमेव पूल असल्याने व सध्या खरीप हंगामाची मशागतीची कामे वेगाने सुरू झाली असल्याने व या परिसरात एकमेव पूल असल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय झाल्याचे शेतकऱ्यांनी बोलून दाखवले. तरी पाटबंधारे विभागाने त्वरीत येथे नवीन पूल करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.