सामाजिक संदेश देणाऱ्या सात चित्ररथांचा सहभाग
सातारा – सकाळचा सुखद गारवा …. राजवाडयावर घुमणारा बँड पथकाचा नाद , वेगवेगळ्या सामाजिक विषयांचे देखणे चित्ररथ अशा जल्लोषपूर्ण वातावरणात ग्रंथदिंडीने 21 व्या ग्रंथ महोत्सवाला साताऱ्यात सुरवात झाली . या दिंडीमध्ये शहरातील वेगवेगळ्या शाळांचे साडेआठशे विद्यार्थी सहभागी झाले होते .
ग्रंथदिंडी हा शब्द जागर महोत्सवाचा एक पारंपारिक भाग बनला आहे . त्याचा उत्साह शालेय विद्याथ्र्यांच्या सहभागाने दिसून येतो . शहरातील वेगवेगळ्या शाळांचे साडेआठशे विद्यार्थी पर्यावरण बचाओ, प्लास्टिकमुक्त भारत अशा फलकांसह राजवाडा गांधी मैदान येथे उत्स्फूर्ततेने एकत्र आले होते. सकाळी नऊ वाजता नगराध्यक्ष माधवी कदम व उपनगराध्यक्ष किशोर शिंदे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या हस्ते श्रीफळ वाहून व ग्रंथपूजनाने ग्रंथदिंडीची सुरवात करण्यात आली.
या वेळी ग्रंथ महोत्सव कार्यवाह शिरीष चिटणीस, प्राचार्य डॉ यशवंत पाटणे, वि . ना . लांडगे, प्रदीप कांबळे, डॉ राजेंद्र माने, नंदा जाधव, सुनीता कदम, प्रल्हाद पार्टे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक इं यावेळी उपस्थित होते .नगराध्यक्ष माधवी कदम व पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी ग्रंथ पालखी खांद्यावर घेतली आणि बँड व ढोलाच्या निनादात दिंडी राजपथावरून जिल्हा परिषद मैदानावरील कर्मवीर भाऊराव पाटील साहित्य नगरीकडे मार्गस्थ झाली . ग्रंथदिंडीमध्ये सात चित्ररथ सामील झाले होते . जकातवाडी कवितांचे गाव, वृक्षवल्ली आम्हा सोयरे – पर्यावरण वाचवा, स्वच्छता अभियान रॅली, स्वच्छ सातारा सुंदर सातारा, प्लास्टिक टाळा पर्यावरण वाचवा इ सामाजिक विषयांचे भान देणाऱ्या चित्ररथांनी सातारकरांचे सकाळी सकाळी लक्ष वेधून घेतले .