मुंबई – शेअर बाजार निर्देशांक सध्या उच्च पातळीवर आहेत. त्याचबरोबर सायंकाळी चौथ्या तिमाहीच्या राष्ट्रीय आकडेवारी जाहीर होणार होती. त्यामुळे नव्या मंत्र्यांनी कार्यभार स्वीकारूनही शुक्रवारी शेअर बाजार निर्देशांकात घट झाली. शुक्रवारी बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 117 अंकांनी म्हणजे 0.30 टक्क्यांनी कमी होऊन 39,714 अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 23 अंकांनी कमी करून 11,922 अंकांवर बंद झाला.
गुरुवारी परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी 1664 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली तर देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 1122 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. आज वाहन, ग्राहक वस्तू, ऊर्जा, धातू आणि वित्तीय क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची विक्री झाल्यामुळे निर्देशांकात घट झाली. अर्थ मंत्रालयाचा कार्यभार निर्मला सीतारमन आणि उद्योग मंत्रालयाचा कार्यभार पियुष गोयल यांनी स्वीकारला आहे.
या आठवड्यात त्यांच्या कामकाजाचे स्वरूप समजू शकेल. संध्याकाळी राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी जाहीर होणार आहे. त्याचबरोबर इतरही आकडेवारी या आठवड्यात जाहीर होणार आहे. शिवाय रिझर्व बॅंकेचे पतधोरणही या आठवड्यात जाहीर होणार आहे. त्या आधारावर निर्देशांकांची पुढील वाटचाल अवलंबून राहण्याची शक्यता आहे.
“मोठ्या आशावादाने नवे मंत्रिमंडळ स्थानापन्न होत असतानाच विकासदर घसरल्याची आणि बेकारीचा दर वाढल्याची आकडेवारी जाहीर झाली आहे. याचा सुगावा गुंतवणूकदारांना लागल्यामुळे शुक्रवारी विक्री झाली. आगामी काळातही या आकडेवारीचा परिणाम जाणवेल.
-हेमांग जानी, सल्लागार सेवा विभागप्रमुख, शेअर खान