उरूळी देवाची ः लावलेली झाडे आता काढण्याची वेळ
चुकीच्या जागीच केले वृक्षारोपण
उद्यान विभागाकडून चुकीच्या जागीच हे वृक्षारोपण केल्याचा प्रकार समोर आला आहे. ज्या ठिकाणी झाडे लावली आहेत, त्या ठिकाणी शास्त्रीय पद्धतीने मुरूम, माती वापरून कचरा भूगर्भात जिरविण्यात आला आहे. त्यामुळे कचऱ्यातून जमिनीखाली लिचेट (काळे पाणी) तसेच मिथेन वायू तयार होतो. त्यामुळे हे लिचेट आणि गॅस संकलीत करण्यासाठी पालिकेकडून या कॅपिंगच्या कामात आडवे आणि उभे पाईप टाकण्यात आले असून त्याचे जाळेच तयार झाले आहे. त्यामुळे या कचऱ्यावर झाडे लावल्यास त्याची मुळे या पाईपमध्ये अडकून हे पाईप जॅम होण्याची तसेच फुटण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून उद्यान विभागास पत्र पाठवून ही झाडे डेपो परिसरातील इतर जागेत लावण्याच्या सूचना केल्या आहेत.
पुणे – केंद्र शासनाच्या अमृतवन प्रकल्पांतर्गत महापालिकेकडून दोन दिवसांपूर्वी घाईगडबडीने करण्यात आलेले वृक्षारोपण चुकीच्या जागेवर करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे उद्यान विभागाच्या माध्यमातून लावण्यात आलेली ही सर्व झाडे काढण्याची वेळ पालिका प्रशासनावर आली आहे. उरूळी देवाची येथील कचरा डेपोच्या ठिकाणी प्रशासनाकडून कॅपिंग केलेल्या 40 एकर जागेवर हे वृक्षारोपण करण्यात येणार होते.
केंद्र सरकार पुरस्कृत अभियानांतर्गत “अमृतवन’ प्रकल्पाला 2015 ते 2018 या सर्व वर्षांत निधी मंजूर झाला आहे.केंद्र सरकारने सन 2015-16 ला 100 लक्ष, सन 2016-17 ला 150 लक्ष आणि सन 2017-18 रोजी दोनशे लक्ष रुपये निधी प्राप्त झाला आहे. महापालिकेच्या हद्दीमध्ये बगीचा क्षेत्र विकास (ग्रीन स्पेस डेव्हलपमेन्ट) वाढवण्याच्या दृष्टीने या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे.
यामध्ये केंद्र सरकार 50 टक्के, राज्याचे 25 टक्के आणि महापालिकेचे 25 टक्के असे आर्थिक समभाग आहेत. सन 2015-16 साठी हडपसर येथील पाटबंधारे विभागाच्या जागेवर प्रकल्प पूर्ण करण्यात आला. त्यानंतर आता 2016-17-18 मध्ये देवाची उरळी येथील कचरा डेपोमध्ये हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. त्यासाठी मागील आठवड्यात अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांच्या हस्ते या कॅपिंग केलेल्या जागेवर मोठा गाजावाजा करत हे वृक्षारोपण केले.