पालघर – पालघर जिल्ह्याच्या जव्हारच्या अंबिका चौक भागात राहणारी 13 जण कालमांडवी धबधब्यात पोहण्यासाठी गेले होते. परंतु पावसाच्या पाण्यामुळे धबधब्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे 5 जण बुडाले होते. या पाचही जणांचे मृतदेह आज सापडले आहेत.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाने तपास सुरू केला होता. यानंतर आज सायंकाळी उशिरापर्यंत 5 मृतदेह बाहेर काढण्यात आले. या धबधब्याकडे 13 जण फिरायला गेले होते. तिथे 5 जणांचा बुडून मृत्यू झाला आणि सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाचे प्रवक्ते सचिन नवाडकर यांनी दिली आहे.
धबधब्यात आंघोळ करायला गेलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की, प्रत्येक पावसाळ्यात हा धबधबा तयार केला जातो आणि आजूबाजूच्या परिसरातील लोक इथे सहलीला येतात. सर्व मुलं धबधब्याच्या काठावर आंघोळ करत होती. परंतु काही मुलं मस्ती करत खोलवर गेली आणि ही दुर्घटना घडली.