नवी दिल्ली – पंतप्रधानांच्या योजनेतील जनधन खात्याबाबत असलेल्या नियमांचा फटका भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) बसला आहे. त्यामुळे ज्या खेळाडूंचे अशा प्रकारचे खाते आहे त्यांना पूर्वी जाहीर केलेल्या बक्षिसांची रक्कम त्यांच्या खात्यात जमा करणे मंडळाला शक्य होत नसल्याचे उघड झाले आहे.
मंडळाचा वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा दरवर्षी आयोजित केला जातो. त्यावेळी ज्या खेळाडूंना रोख रकमेचे पुरस्कार देण्याचे जाहीर केले जाते. त्यांतील काही खेळाडूंचे जनधन खाते असल्याचे समोर आले आहे. त्या खात्यात 50 हजारांपेक्षा जास्त रक्कम जमा करता येत नसल्याने या खेळाडूंना जाहीर करण्यात आलेली दीड लाख रुपयांची रक्कम मंडळाला त्यांच्याकडे सुपूर्द करता आलेली नाही. कनिष्ठ पातळीवरील स्पर्धेत सहभागी होत सरस कामगिरी केलेल्या खेळाडूंना हे रोख पुरस्कार गेल्या जानेवारी महिन्यात झालेल्या पुरस्कार सोहळ्यात जाहीर झाले होते.
आयपीएलबाबत निर्णय नाहीच….
रिकाम्या मैदानांवर जरी सरावाला तसेच स्पर्धांना परवानगी सरकारकडून देण्यात आली असली तरीही इतक्यात आयपीएल स्पर्धेच्या आयोजनाबाबत निर्णय घेतला जाणार नसल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे. पुढील काळात सर्व परिस्थितीचा आढावा घेऊनच याबाबत योग्य वेळी माहिती जाहीर केली जाईल, असेही सांगण्यात आले आहे.