सुनील बटवाल
चिंबळी – मानवी जीवनाशी, त्याच्या भावभावनांशी फुलांचे नाते आहे. जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या प्रवासात सुख-दु:खाच्या क्षणी व्यक्त होण्यासाठी फुलांची साथ लागते. परंतु लॉकडाऊनमुळे फुलांचा व्यवसायच बंद पडल्याने फुलांची शेतीच अडचणीत आली. लग्नसराईमध्ये मंगल कार्यालये, हॉटेल, सभागृह सजविण्यासाठी मोठ्या प्रमाणात फुले विकली जात होती. याशिवाय एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांत लग्नाचे मुहूर्त असतात. कोरोनामुळे लग्न समारंभ स्थगित झाले. परिणामी फुलांचा व्यवसाय थांबला.
लॉकडाऊनमुळे फुलांचा व्यवसायच बंद पडल्याने खेड तालुक्याच्या दक्षिण भागातील फुलांचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. शहराला लागून असलेल्या चिंबळी, केळगाव, निघोजे, वडगाव घेनंद, कुरुळी आदी गावातील हजारो एकरांतील बहरलेली फूलशेती कोमेजली असून गेल्या चाळीस दिवसांत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
नुकसानभरपाई द्या
खेडच्या दक्षिण भागातील गावांमधील शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह फूलशेतीवर आहे. आतापर्यंत फूल मार्केट सुरू होईल या अपेक्षेने फूल तोडण्यासाठी खर्च केला; परंतु हा खर्चही वाया गेला. आता शेतात असलेले फुलांचे उत्पादनही जाणार असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली.