मित्रानेच आवळला गळा ः एकाच फ्लॅटवर तीन बॅंकांची कर्जे काढल्याचा प्रकार उघडकीस
पिंपरी – गेल्या पंधरा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तेजस भिसे (वय. 28, रा. रहाटणी) या तरुणाचा खून झाल्याचे उघड झाले आहे. या तरुणाचा खून पैशांच्या वादातून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात दत्ता बिरंबळ (वय, 30, रा. नेवाळेवस्ती, चिखली) व समाधान भोगल (वय,24 रा. जाधववाडी, चिखली) या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, या प्रकरणामध्ये मित्रांनीच तेजसचा खून केला. मैत्रिणीच्या एकाच फ्लॅटवर तीन-तीन बॅंकांची कर्जे काढून पैसे वापरल्याचा प्रकार देखील या खून प्रकरणामुळे समोर आला आहे. तेजस भिसे हा जुन्या गाड्यांच्या खरेदी विक्रीचे काम करत होता. चिखली या ठिकाणी तेजस याच्या मैत्रिणीच्या नावावर फ्लॅट होता. सदरच्या फ्लॅटवरती तेजस याने आरोपी दत्ता बिरंबळ याला कर्ज काढून पैसे वापरण्यास दिले होते. तसेच, दत्ता बिरंबळ व साथीदारांनी याच फ्लॅटवर बनावट कागदपत्रे सादर करुन अन्य तीन बॅंकांची कर्ज प्रकरणे मंजूर करुन घेतली होती. मात्र, सदरच्या बॅंकांचे हफ्ते आरोपीने न भरल्याने तेजसच्या मागे हफ्त्यांसाठी बॅंकांनी तगादा लावला होता.
यामुळे, तेजस बॅंकांचे कर्ज फेडण्यासाठी दत्ता बिरंबळ याच्याकडे पैशाची सतत मागणी करत होता. यातून दोघांमध्ये वाद झाला होता. यामुळे, चिडलेल्या आरोपींनी जामखेड या ठिकाणी तेजस याचा होंडा सिटी कारमध्ये गळा आवळून खून केला. तसेच, मृतदेह अहमदनगर येथील सौताडा घाटात 60 फूट खोल दरीत टाकून दिला होता. दरम्यान आरोपींनी मयताचे कपडे, बूट, बेल्ट जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. ही कारवाई पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन, अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे, पोलीस उपायुक्त पंकज ढाकणे, सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे (गुन्हे), पोलीस उपनिरीक्षक हरिष माने, सिध्दनाथ बाबर व इतर कर्मचाऱ्यांनी केली.
बॅंकांची फसवणूक करणारी टोळी सक्रिय
गृह कर्ज, वाहन कर्ज काढण्यासाठी बॅंकांना बनावट कागदपत्रे सादर करुन कर्ज प्रकरणे मंजूर करणारी टोळी राज्यभरात सक्रिय झाली आहे. या प्रकरणातून बॅंकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे. तसेच, बनावट कागदपत्राद्वारे मंजूर झालेल्या कर्ज प्रकरणाची रक्कम भरली जात नसल्याने बॅंकांचे आर्थिक नुकसान होत आहे. यामुळे, बॅंकाची फसवणूक करणाऱ्या टोळींविषयी तपास करण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.