कोपरगाव – कोल्हे गटातून पाकिटासाठी फुटून गेलेले फुटीर आहेत. त्यांचा खांदा वापरून कोल्हेंवर टीका करावी लागणे ही काळेंची नामुष्की आहे. त्यामुळे काळे गटाने स्वतःचे निष्ठावंत खांदे तयार करावेत, अशी सणसणीत चपराक भाजपचे प्रसाद नरोडे यांनी लगावली आहे.
नरोडे यांनी म्हटले आहे की, गेल्या तीन वर्षांत डोळ्यांनी दिसेल असे एकही भरीव काम विद्यमान आमदारांना करता आलेले नाही. जी कामे झाली ती माजी आ. स्नेहलता कोल्हे यांच्या कार्यकाळात झालेली आहेत. त्याचे लोकार्पण करण्याचे दुर्दैव काळेंवर आले आहे. प्रत्यक्षात विकासाचा मागमूस नसलेल्या काळेंच्या कार्यकर्त्यांची परिस्थिती ही आपलाच बॅंड आणि आपणच नाचायचं अशी झाली आहे.
जेसीबीने गुलाल उधळून विकासाच्या वल्गना करणाऱ्या आ. काळे यांचे एक ना धड भारभर चिंध्या अशा कोलांटउड्या खाणारे कार्यकर्ते अर्धवटराव आहेत हे जनता जाणून आहे. जास्त बोललो तर जास्त मोठे पाकीट मिळेल, या लालसेपोटी काळे गटात मी बोलू का तू बोलू अशी पाकीट स्पर्धा रंगली आहे. आपली पातळी किती व आपण बोलतोय किती? आणि त्या बदल्यात पदरात पडणारे पाकीट किती याचा ताळमेळ लावूनच पाकिटसम्राटांनी बोलावे, असा खोचक सल्ला नरोडे यांनी दिला आहे.
आमची निष्ठा कोल्हे कुटुंबावर आहे. ज्यांची निष्ठा पावला पावलावर विकली जाते, त्यांनी अधिकचे बोलू नये. नाहीतर त्यांचे पाकीट कुठून कुठे जातात हे आम्हाला जनतेसमोर मांडावे लागेल.
प्रसाद (आबा) नरोडे, भारतीय जनता पक्ष