प्रसंगी राजीनामे देण्याचीही तयारी
गुवाहाटी : भाजपची सत्ता असणाऱ्या आसाममध्ये नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाला मोठा विरोध होत आहे. त्यामुळे जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याने भाजपचे आमदार धास्तावले आहेत.
वादग्रस्त ठरलेल्या कायद्यामुळे सर्वांत प्रथम आसामसह ईशान्येकडील राज्यांत तीव्र निदर्शने सुरू झाली. त्या निदर्शनांना काही ठिकाणी हिंसक वळण मिळाले. निदर्शकांनी भाजपच्या काही आमदारांच्या आणि नेत्यांच्या घरांवरही हल्ले केले. त्यापार्श्वभूमीवर, भाजप आमदारांच्या एका गटाने गुरूवारी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांची भेट घेतली. कायद्याबाबत जनतेच्या मनातील भीती आणि संशय दूर करण्यासाठी पाऊले उचलण्यात यावीत, असे साकडे त्या आमदारांनी घातले.
कायद्यामुळे भाजपमध्येच अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही मंत्र्यांच्या वक्तव्यांमुळे जनता आणखीच नाराज झाली आहे. त्यातून आमदारांना जनतेच्या संतापाचा सामना करावा लागत आहे, असे त्या आमदारांनी नंतर पत्रकारांशी बोलताना म्हटले. जनता आता आमच्या राजीनाम्यांची मागणी करू लागली आहे. समस्या सुटणार असतील तर राजीनामे देण्याची आमची तयारी आहे, असेही त्या आमदारांनी स्पष्ट केले.