नवी दिल्ली – भारतात शेतकऱ्यांचे जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडेऊ यांनी पाठिंबा जाहीर केल्याने भारत सरकारने त्यांचा या आधीच अधिकृतपणे निषेध केला आहे. आता भारतीय जनता पक्षानेही त्यांच्यावर टीका केली आहे.
भाजपच्या विदेश व्यवहार विभागाचे प्रमुख विजय चौथाईवाला यांनी या संबंधात एक ट्विटर संदेश जारी केला असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, कॅनडाच्या पंतप्रधानांनी भारतातील शेतकरी आंदोलना विषयी अशी शेरेबाजी करणे किंवा या आंदोलना विषयी त्यांनी चिंता व्यक्त करणे ही निव्वळ ढोंगबाजी आहे.
त्यांनी म्हटले आहे की जागतिक व्यापार संघटनेत कॅनडाने किमान आधारभूत किंमत आणि अन्य कृषी हिताच्या धोरणांना विरोध केला होता. भारतातील शेतकऱ्यांचे हित जोपासणण्यासाठी जे आयात निर्बंध लागू करण्यात आले होते त्यालाही कॅनडाने विरोध केला होता.
भारताने जागतिक व्यापार संघटनेत आपल्या देशातील कृषी क्षेत्रासंबंधात जे धोरण मांडले होते त्याला कॅनडाने विरोध केला होता. त्यातूनच भारतातील शेतकऱ्यांच्या हिताची कॅनडाला किती काळजी आहे हे दिसून येते असे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी भारतीय शेतकऱ्यांविषयी केलेली विधाने म्हणूनच केवळ ढोंगबाजी ठरतात असे चौथाईवाला यांनी म्हटले आहे.