लाहोर – भारत व पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षिय सामने तसेच मालिका भारतीय केंद्र सरकारमुळे ठप्प झाले आहेत. बीसीसीआयवर भारताच्या केंद्र सरकारने संपूर्ण नियंत्रण आहे, म्हणूनच हे सामने होउ शकत नाहीत, अशा शब्दात पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे माजी अध्यक्ष एहसान मणी यांनी टीका केली आहे.
भारत व पाकिस्तान या दोन संघात केवळ आयसीसीच्या स्पर्धांमध्येच सामने होतात. या दोन संघात द्विपक्षिय मालिका होत नाहीत. त्याचे मुख्य कारण भारतातील केंद्र सरकारच असल्याचे मणी म्हणाले.
केंद्रातील भाजपा सरकारच बीसीसीआय चालवत आहे. त्यामुळे दोन्ही देशात क्रिकेट सामना होऊ शकत नाही. प्रत्येक वेळी सामन्यांसाठी आम्हीच पुढाकार घेत असतो, आता बीसीसीआयनेही पुढाकार घेतला पाहिजे. भारतीय संघ पाकिस्तानात येऊन खेळू शकतो. आता त्यांना आमच्याशी खेळायचे असेल तर त्यांनी आधी पहिले पाऊल उचलायला हवे. भारत आणि पाकिस्तानमध्ये क्रिकेट सामना होण्याला मी कधीच नकार दिला नाही. पण आम्हालाही काहीतरी आत्मसन्मान आहे. त्यामुळे आम्हीच भारताला सतत प्रस्ताव का द्यायचा, असा सवालही त्यांनी केला.
बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली असेल, पण सचिव भारताचे गृहमंत्री अमित शहा यांचा मुलगा जय शहा आहे. त्यामुळे अध्यक्ष कुणीही असला तरी बीसीसीआयवर खरे नियंत्रण भाजपा सरकारचेच आहे, असेही मणी म्हणाले.
2012 सालानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात मालिका झालेली नाही. त्यावेळी पाकिस्तानचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. पण त्यानंतर दोन्ही देशातील राजकीय संबंधात तणाव आल्यावर हे सामने थांबले. तेव्हापासून आयसीसीची स्पर्धा वगळता भारत आणि पाकिस्तानात एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळवला गेला नाही. अलीकडेच पाकिस्तानचे माजी क्रिकेटर रमीझ राजा यांनी आयसीसीला एक प्रस्ताव दिला होता, ज्यामध्ये भारत-पाकिस्तान-इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या चार देशात टी-20 स्पर्धा आयोजित कराव्यात, असा हा प्रसताव होता. मात्र, बीसीसीआयने हा प्रस्ताव नकारला होता.