नवी दिल्ली – करोना व्हायरसचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच असून याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि सर्वच राज्य सरकार आवश्यक ती पाऊले उचलत आहेत. मात्र करोनाच्या लढाईत सरकार अयशस्वी झाले असे म्हणत लडाखच्या भाजप प्रदेशाध्यक्ष छीरिंग दोरजे यांनी राजीनामा दिला आहे.
छीरिंग दोरजे म्हणाले कि, लडाखमधील २०,००० पेक्षा जास्त लोक देशभरात अडकले आहेत, परंतु लडाख प्रशासन त्यांना परत आणण्यात अपयशी ठरले आहे. लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या लोकांना आणण्याच्या प्रशासनाची वृत्ती असंवेदनशील राहिली आहे, असे त्यांनी म्हंटले आहे. यासंदर्भात छीरिंग दोरजे यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांना पत्र लिहिले आहे.
देशभर अडकलेल्या लडाखच्या लोकांची परिस्थितीविषयाची संपूर्ण माहिती उच्च अधिकाऱ्यांना दिली होती. त्यांनी याबाबत राष्ट्रीय उपाध्यक्ष अविनाश राय खन्ना यांनाही माहिती दिली होती. पण परिस्थितीत कोणताही बदल झाला नाही. अखेर छीरिंग दोरजे यांनी पदाचा राजीनामा देत नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, लडाखमध्ये करोना विषाणूचा संसर्ग वाढतच असून करोना रूग्णांची संख्या ४१ झाली आहे.