जयंत कुलकर्णी
राष्ट्रवादी कॉंग्रेसने रोखला भगवेकरणाचा वारू : शिवसेनेचे अस्तित्वच जिल्ह्यात संपुष्टात
नगर – भाजपसह गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिलेला बारा विरुद्ध शुन्यचा नारा आजच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर फुसका ठरला. सन 2009 च्या विधानसभा निवडणुकीपासून जिल्ह्यात सुरू झालेले भगवेकरणाचे वारे या निवडणुकीत थोपवून तब्बल सात जागांवर जिंकत राष्ट्रवादीने जिल्ह्यात वर्चस्व मिळविले. भाजपला अवघ्या तीन जागांवर आपला गाशा गुंडाळावा लागला तर शिवसेनेला खाते देखील उघडता आले नाही. कॉंग्रेसने तीन जागा लढून दोन जागा जिंकत बुडत्याला काडीचा आधार दिला. जिल्ह्यात बारा विधानसभा मतदारसंघात झालेल्या सरळ लढतीमुळे भाजप – शिवसेना युतीचे पानिपत झाले. फाजिल आत्मविश्वासातून भाजपच्या नेत्यांना एकतर्फी वाटणाऱ्या या निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी देत युतीच्या उमेदवारांना मतदारांनी नाकारल्याचे दिसून आले.
लोकसभा निवडणुकीत युतीला मिळालेले घवघवीत यशामुळे कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे विद्यमान आमदारांसह अनेक नेत्यांनी शिवसेना व भाजपमध्ये उड्या मारल्या. अखेरच्या क्षणापर्यंत युतीच्या उमेदवारीसाठी अनेकांनी प्रयत्न केले. राष्ट्रवादीची उमेदवारी नको म्हणून भाजप व शिवसेनेचा पर्याय स्वीकारण्याचा जोरदार प्रयत्न केला. त्यामुळे भाजपच्या नेत्यांसाठी ही निवडणूक सोपीच वाटली होती. प्रतिस्पर्धी कुस्तीसाठी पैलवारच नसल्याची वल्गना करीत भाजपसह शिवसेनेच्या उमेदवारांना ही निवडणूक आपण जिंकणार असल्याचा आत्मविश्वास बळावला होता.
परंतु निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात निवडणुकीचा कल बदलल्याचे दिसून आले. राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी युतीच्या उमेदवारांसमोर चांगलेच आव्हान उभे केल्याने या युतीच्या उमेदवारांची दमछाक झाली. संगमनेर व शिर्डी वगळता उर्वरित दहा जागांवर अटीतटीची लढत झाली. भाजपने जिल्ह्यात आठ जागा लढविल्या. या आठही जागा भाजपच जिंकणार असल्याचा दावा केला जात होता. पण या अटीतटीच्या लढतीमध्ये भाजपला कशाबश्या तीन जागा मिळाल्या. भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांनी हजेरी लावली. राष्ट्रवादीची भिस्त केवळ शरद पवार यांच्यावर होती. त्यांनी प्रत्येक मतदारसंघात सभा घेतल्या होत्या.
त्या शिर्डीत राधाकृष्ण विखे हे विजयी होणार हे सुरवातीपासून निश्चित होते. त्यामुळे शेवगाव-पाथर्डी व श्रीगोंदा अशा दोन जागा कशीबश्या राखण्यात भाजपला यश आले. अर्थात या मतदारसंघात देखील राष्ट्रवादीच्या ऍड. प्रताप ढाकणे यांनी विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना घाम फोडला. त्यामुळे आ. राजळेंना निसटताच विजय मिळाला आहे. तसा तोच श्रीगोंद्यात माजीमंत्री बबनराव पाचपुतेंचा झाला आहे. आठ जागांचा दावा करणाऱ्या भाजपचे विद्यमान पाच आमदार पराभूत झाले.
कर्जत-जामखेड मतदारसंघात जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. पवार यांच्यामुळे शिंदेंची चांगलीच दमछाक झाली होती. तरी विजय आपला असल्याचा विश्वास शिंदे व्यक्त करीत होते. परंतु पवार यांनी निवडणुकीपूर्वी वर्षभरपासून जोरदार तयारी करून मतदारसंघ पिंजून काढला होता. शिंदेंनी अनेक जवळचे कार्यकर्ते व नेते दुखावले होते. तसेच कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे नेते व कार्यकर्ते जवळ करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यात त्यांना यश आले नसल्याचे निकालावरून स्पष्ट होते.
कर्जत – जामखेडकरांनी रोहित पवार यांच्या माध्यमातून नव्या चेहऱ्याला संधी देवून तब्बल 25 वर्ष वर्चस्व आलेल्या या मतदारसंघात राष्ट्रवादीने आपला झेंडा रोवला. कोपरगावमध्ये विद्यमान आमदार स्नेहलता कोल्हे व राष्ट्रवादीचे आशुतोष काळे यांच्यात अखेरच्या क्षणापर्यंत चुरशीची लढत झाली. कोल्हे कधी पुढे तर कधी काळे पुढे अशी स्थिती असतांना शेवटच्या फेरीत काळे यांनी विजयाचा टिळा लावला. तरी स्थिती श्रीगोंद्यात झाली. राष्ट्रवादीकडे उमेदवार नसतांना पक्षाचे उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांच्या गळ्यात उमेदवारी टाकण्यात आली. एकतर्फीच निवडणूक होणार असल्याचे चित्र असल्याने भाजपचे उमेदवार माजीमंत्री बबनराव पाचपुते यांनी सुटकेचा निःश्वास टाकला. त्यात नागवडे गट देखील भाजपमध्ये आल्याने शेलार यांची एकाकी झुंज होती. सोबत माजी आमदार राहुल जगताप होते. शेलार यांनी कडवी झुंज दिली. पण अखेर पाचपुतेंच विजयी झाले.
नेवासे मतदारसंघात विद्यमान आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा फाजिल आत्मविश्वास नडला. त्यात गडाखांनी ही निवडणूक मनावर घेतली होती. त्यात माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी गडाखांना साथ दिल्याने विजयाचा मार्ग मोकळा झाला. पारनेरमध्ये विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी यांचा दणदणीत पराभव झाला आहे. राष्ट्रवादीच्या नीलेश लंके यांनी औटींच्या नाराजीचा तसेच कार्यपद्धतीचा फायदा घेवून हा विजय खेचून आणला. राहुरीत विद्यमान भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांचा अखेर राष्ट्रवादीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी पराभव करून सलग दोन वेळा झालेल्या पराभवाची परत फेड केली.
अकोल्यात 40 वर्षांनंतर पिचडांना खऱ्या अर्थाने पराभवाला समोरे जावे लागले. पिचडांचा भाजप प्रवेश अकोलेकरांना रुजला नाही. ज्या पक्षाने पिचडांना मोठे केले. सर्व पदे दिली. त्याला सोडून सत्तेसाठी वैभव पिचडांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला. हे अकोलेकरांच्या पचणी पडले नाही. तसेच नवे चिन्हे देखील पोहचविण्यात ते कमी पडले. नगर शहरात राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी पुन्हा आमदाराकीचा टिळा लावला. मागील पाच वर्ष सोडली तर शिवसेनेचे उमेदवार अनिल राठोड तब्बल 25 वर्ष आमदार होते. पण त्या कार्यकाळात शहर विकास पेक्षा त्यांनी नगरकरांच्या संरक्षणाचा मुद्दा जोपासला होता. यावेळी विकासावर ही निवडणूक झाल्याने त्यात राठोड यांचा पत्ता कट झाला.
या निवडणुकीत शिवसेनेचे जिल्ह्यातील अस्तित्वच संपूष्ठात आले. चार जागा लढविल्या पण एकही जागा जिंकता आली नाही. श्रीरामपूरमध्ये कॉंग्रेसमधून शिवसेनेत आलेले आमदार भाऊसाहेब कांबळे व पारनेरमधून औटी, नगर शहरातून राठोड या तीन जागा जिंकल्या जातील असा दावा होता. पण यावेळी शिवसेनेला खाते देखील उघडता आले नाही. भाजपसह शिवसेनेच्या सर्वच जागा निवडून आणण्याची जबाबदारी विखेंनी घेतली होती. परंतु विखे स्वतः श्रीरामपूर, शिर्डी व संगमनेर या तीन मतदारसंघापूरतेच होते. त्यांचे सुपुत्र खासदार डॉ. सुजय विखे यांनी दक्षिणेतील पारनेर वगळता उर्वरित सर्व मतदारसंघात भाषणे ठोकली. या निवडणुकीत विखेंचा करिष्मा चालला नाही. त्यामुळे विखे भाजपमध्ये येवून पक्षाचा तोटाच झाल्याचे दिसत आहे.
युतीमध्ये घुसफुस अखेरपर्यंत
शिवसेना-भाजपची युती झाली. नेते एकत्र आले असले तरी कार्यकर्ते मात्र युतीमय झाले नव्हते. त्यामुळे भाजपच्या उमेदवारांचा प्रचारात शिवसेनेचे कार्येकर्ते दिसले नाही तर शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारापासून भाजप लांब होती. त्यामुळे आघाडीला त्याचा फायदा झाल्याचे चित्र आहे. तसे आघाडीत दोन्ही कॉंग्रेसच्या नेते व कार्येकर्ते प्रचारात सक्रिय दिसले.
नव्या चेहऱ्यांना पसंती
या निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना मतदारांनी पसंत दर्शविली असल्याचे निकालावरून स्पष्ट झाले. कर्जत-जामखेडमधून रोहित पवार, पारनेरमधून नीलेश लंके, अकोलेतून डॉ. किरण लहामटे, राहुरीतून प्राजक्त तनपुरे तर कोपरगावामधून आशुतोष काळे हे आमदार झाले आहे. विशेषतः तरूण मंडळींना संधी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाचे नेतृत्व तरूणांच्या हातीत देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानुसार नगरकरांनी देखील त्याला प्रतिसाद दिल्याचे दिसून येते.