नवी दिल्ली – भारतातील बऱ्याच राज्यात सण उत्सवामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका वेगाने वाढत आहे. केरळ, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, कर्नाटक आणि दिल्लीमध्ये सण उत्सवामुळे कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढले आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज (27 ऑक्टोबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
तसेच गेल्या पाच आठवड्यात कोरोनाने मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे, असेही आरोग्य मंत्रालयाने सांगितले.
फक्त पाच राज्यात 49.4 टक्के प्रकरणं –
गेल्या 24 तासात केरळ, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, कर्नाटक आणि दिल्ली या पाच राज्यात 49.4 टक्के कोरोना प्रकरणाची नोंद झाली आहे. सण उत्सवाचे दिवस हे याचे मोठे कारण असू शकते.
फक्त पाच राज्याचं प्रमाण 49.4 टक्के असणं ही खूप चिंतेची बाब आहे. आम्ही या राज्याच्या सरकारशी बोलत आहोत, असे आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले.
पाच आठवड्यांपासून मृत्यूच्या प्रमाणात घट-
गेल्या 24 तासात 58 टक्के मृत्यू हे पाच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात झाले आहेत. यामध्ये महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली, छत्तीसगड आणि कर्नाटकचा समावेश आहे.
तसेच गेल्या पाच आठवड्यांपासून कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणात घट झाली असून भारतात आतापर्यंत एक लाखाहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती राजेश भूषण यांनी दिली.