नवी दिल्ली : करोनाची साथ आणि नंतरच्या लॉकडाऊनचा उद्योग जगतावर विपरित परिणाम झाला असून त्यामुळे भरतात 1979 नंतरची सर्वात मोठी मंदी येणार असल्याचे भाकीत गोल्डमन सॅचे या वित्तीय संस्थेने केले आहे.
करोना विषाणू दीर्घकाळ राहतील, असे भाकीत जागतिक आरोग्य संघटनेचे अधिकारी करत आहेत. त्यामुळे भारतासह अनेक देशांनी आर्थिक व्यवहार सुरू केले आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. पाच टप्प्यात जाहीर केलेल्या या पॅकेजमुळे अर्थव्यवस्थेला काही प्रमाणात चालना मिळेल, अशी वाटणारी आशा गोल्डमनच्या भाकीतामुळे काहीशी मावळ्याचे चित्र आहे.
या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेला 45 टक्के फटका बसेल. तर सकल राष्ट्रीय उत्पन्न पाच टक्क्यांनी कमी होईल. ही घसरण 41 वर्षातील सर्वात मोठी असेल. मात्र, तिसऱ्या तिमाहीत सर्व व्यवहार सुरळीत झाल्यावर भारताची अर्थव्यवस्था 20 टक्क्यांनी सुधारेल, असे गोल्डमनने आपल्या अहवालात म्हटले आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने सोमवारी लॉकडाऊनच्या नियमावलीत शाळा, कॉलेजेस, मॉल्स, सिनेमागृहे, विमाने आणि रेस्टॉरंट आदीवरील बंदी कायम ठेवली आहे. केंद्र शासनाच्या सुचनेनुसार राज्यांनी प्रतिबंधित क्षेत्र सील करून अन्य ठिकाणी आर्थिक व्यवहार सुरू करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.