मुंबई: पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणामुळे वादात सापडलेले वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, संजय राठोड यांनी मातोश्रीवर आपला राजीनामा पाठवला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्याच्या राजीनाम्यावर काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, आज मातोश्रीवर संजय राठोड यांच्याबाबत निर्णय घेण्यासाठी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची महत्त्वाची बैठकही पार पडणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर ही बैठक होणार का, हेदेखील बघावे लागेल. संयमी पण कडक शिस्तीसाठी ओळखले जाणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेतली होती. तसेच या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते.त्यानुसार आज ही कारवाई करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, संजय राठोड यांनी नेमका कोणत्या प्रकरणात राजीनामा दिला हे एव्हाना राज्याला माहिती झालं आहे. मूळची परळीची असलेली 22 वर्षाची पुजा चव्हाण पुण्यात शिकण्यासाठी आली होती. तिच्या भावासोबत ती पुण्यातल्या हडपसर भागात रहात होती. रविवारी मध्यरात्री 1 च्या आसपास तिनं सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारली. हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच तिचा जीव गेला. महमंदवाडी परिसरातल्या हेवन पार्कमध्ये ही घटना घडली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिच्या आत्महत्येचा आणि विदर्भातल्या एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. प्रेमसंबंधातूनच पुजानं स्वत:ला संपवल्याचं बोललं जाऊ लागलं. पण पुजाच्या आत्महत्येनंतर कुठलीही चिठ्ठी किंवा इतर मेसेज असलेलं काही सापडलेलं नाही. पोलीसांनीही तशी काही माहिती दिलेली नाही.