मकर संक्रांत नव्हे, नागपंचमी हा पतंग उडवण्याचा दिवस
पुणे – पारंपारिक पद्धतीने पतंग उडवण्याचा सणाचा दिवस हा मकरसंक्रांत नसून, तो नागपंचमी आहे. मात्र, नागरिकांच्या प्रथा-परंपरेची सरमिसळ झाल्याने आता नागपंचमीऐवजी मकरसंक्रांतीला पतंग महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. त्याला प्रसिद्धीदेखील दिली जाते. परिणामी, पारंपारिक सणांचे दिवस बदलत आहेत. त्यामुळे सणांचे दिवस टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे.
गेली 36 वर्षे अव्याहतपणे एस.एम. जोशी पुलावर दररोज पतंग उडवण्याचा विक्रम करणारे पतंगप्रेमी अजित गोसावी यांच्याशी चर्चा केल्यानंतर पतंग उडवण्याचा उगम, त्यामागील कारणे, बदललेले स्वरुप अशा विविध पैलुंची माहिती मिळाली. मकरसंक्रांतीविषयी केलेल्या चर्चेत विशेषत: महाराष्ट्रात सणवारांचे बदलते दिवस यावर त्यांनी प्रकाश टाकला.
रंगपंचमी हा रंग खेळण्याचा पारंपारिक सण. मात्र, हळुहळू याऐवजी आता होळीच्यादिवशी हा सण साजरा होत आहे. तर, नागपंचमी हा पतंग उडवण्याचा सण. पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांत यादिवशी पतंग महोत्सवाचे होणारे आयोजन आता लोप पावत आहे. मात्र, बारामतीत आजही जंगी पतंग महोत्सवाचे आयोजन केले जात असल्याचे गोसावी म्हणाले.
पतंग उडवणे आता प्राणांतिक झाल्याबद्दल गोसावी म्हणाले, “कोणताही सण साजरा करताना, त्यामध्ये निसर्गाची हानी होऊ नये, याची पुरेपूर काळजी घेतली आहे. पतंग उडवतानाही तशीच काळजी घेणे आवश्यक आहे. मात्र, पतंगबाजीसाठी तंगुसाचा मांजा वापरल्याने पक्ष्यांबरोबरच आता माणसांचे जीवदेखील जात आहेत. हा अतिरेक थांबवण्यासाठी या प्राणघातक मांजा विक्रीवर पूर्णत: बंदी आणणे, हाच एकमेव उपाय आहे. निसर्ग व मानवी हानी टाळण्यासाठी पतंग उडवताना साधा दोरा वापरण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला. तसेच पांढऱ्या रंगाचा साधा दोरा वापरल्यास, आकाशात फिरणाऱ्या पक्षांना तो सहजपणे दिसतो. त्यामुळे आकाशातील पक्षांचे अपघात टाळता येऊ शकतात, असे सांगत माझ्या आजपर्यंतच्या अनुभवात एकाही पक्षाचा माझ्या पतंगाच्या दोऱ्याला धडकून अपघात झाला नसल्याचे गोसावी यांनी सांगितले.
पतंग उडविणे हा प्रामाणिक आणि सात्विक आनंद मिळवण्याचा मार्ग आहे. पतंग उडवताना तुम्ही कितीही उंचावर गेलात, तरी तुमची दोरी खाली जमिनीवर असलेल्या व्यक्तीच्या हाती असते. ही बाब तुम्ही कधीही विसरता कामा नये. ही बाब तुम्हाला आई-वडिलांची आठवण करुन देते.
– अजित गोसावी, पतंगप्रेमी.