वास्तविक ज्या लोकांना प्रवरा परिसराने नेहमीच नाकारले त्यांनी केवळ व्यक्तीद्वेषाने प्रेरित होऊन ऐन निवडणुकीत आमच्या परिवाराला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. त्यांना न्यायालयाने दिलेली चपराक ही खूप मोठी आहे, यातून सत्यच पुढे आले. परिवाराची बदनामी करणाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करणार आहे.
राधाकृष्ण विखे विरोधी पक्षनेते
नगर – विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अन्य सहा जणांना बदनाम करण्याच्या हेतूने बापू शंकर दिघे यांनी केशव कुलकर्णी यांच्या मृत्यूबाबत दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आज फेटाळली. लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकीय हेतूने सोशल मिडीयावर ना. विखे यांची विनाकारण बदनामी करणाऱ्यांना चांगली चपराक बसली आहे.
दिघे यांनी राहाता येथील न्यायालयात याचिका दाखल केली होती. यामध्ये 7 एप्रिल 2012 रोजी केशव कुलकर्णी यांचा कालव्याच्या पाण्यात बुडून आकस्मात मृत्यू झाला होता. त्यांच्या अकस्मात मृत्यूचे कारण ज्ञात नसताना ते प्रवरा मेडीकल संस्थेला जमीन देत नाही अशा कारणाने ही घटना घडवून आणली, असा बेजबाबदार आरोप ठेवून, या घटनेत ना. विखे आणि अन्य 6 जणांवर खूनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी बापू दिघे यांनी 5 वर्षानंतर राहाता न्यायालयात याचिकेव्दारे दाखल केली होती. राहाता न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी करुन सर्व पुरावे तपासल्यानंतर कोणतेही साक्षीदार तपासण्याची गरज नसल्याचे याचिकाकर्त्यांना स्पष्ट केले होते.
राहाता न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर बापू दिघे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. न्या. व्ही. एम. देशपांडे यांच्यासमोर सुनावणीसाठी आली असता या घटनेबाबत सर्व वस्तुस्थिती न्यायालयाच्या निदर्शनास आणुन दिली. त्यानंतर न्यायालयाने या घटनेशी ना. विखे व अन्य व्यक्तींचा कोणताही संबध नसल्याने ही याचिका मागे घ्या असे याचिकाकर्त्यांना सुनावले आणि ही याचिकाही न्यायालयाने फेटाळली. मयताच्या कुटुंबीयांची कोणतीही तक्रार नाही. त्यामुळे तक्रारदारांस न्यायालयाने चांगलीच चपराक दिली.