नवी दिल्ली – वर्ल्ड बॅंकेने करोनाच्या वाढत्या संकटासोबत वाढत जाणारी विविध टप्यांवरील आर्थिक समस्या व उपाय यांचे अनुमान देण्याचा प्रयत्न मागील काही दिवसांपासून केला आहे. सध्या बॅंकेकडून भारतासोबत दक्षिण आशियातील देशांच्या आर्थिक विकासावर होणाऱ्या परिणामांची मांडणी केली आहे. यामध्ये चालू आर्थिक वर्षात आर्थिक वृध्दीचा दर खाली येण्याचे अनुमान मांडले आहे यात भारताची अर्थव्यवस्था या विभागातील अन्य देशांच्या तुलनेत सर्वात मोठी असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे भारताच्या आर्थिक विकासात मोठी घसरण होण्याचे अनुमान नोंदवले आहे.
देशाचा अहवाल मांडताना आर्थिक वर्ष 2019-20 साठी 4.8 ते 5 टक्यांनी आर्थिक वृद्धी होण्याचे होण्याचे अनुमान व्यक्त केले होते. तसेच 2014 च्या शेवटपर्यंत नोंदवण्यात आलेल्या चांगल्या कामगिरीचा आलेख करोनाच्या संकटामुळे समाप्त झाला असल्याचेही सांगितले आहे.
या महामारीमुळे श्रीलंका, नेपाळ, भूतान आणि बांगलादेश यांच्या आर्थिक विकासात वेगाने घसरण होणार आहे. तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि मालदीव यांच्या अर्थव्यवस्थेला तर मंदीचा सामना करावा लागणार आहे. सदरच्या देशांचा 7 एप्रिलपर्यंतचा डाटा हा अहवाल तयार करण्यासाठी वापरण्यात आला आहे. कोरोना विषाणुंचा वाढता विळखा येत्या काळात आणखीन घट्ट होण्याची भीती असल्याने योग्य ते पर्यायी मार्ग आर्थिक क्षेत्रासाठी निर्माण करावे लागणार असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.
बॅंका-सरकारसाठी नवीन उपाय
कोरोनाचा फटका जगातील अतिप्रगत देशांनाही बसत आहे. त्यामुळे या संकटातून सावरण्यासाठी प्रत्येक देशांच्या बॅंका आणि सरकार नवीन पर्यायी मार्ग शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामध्ये मजूर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काम करणाऱ्या समूहासाठी सरकारने आर्थिक सहाय देण्याची घोषणा केली आहे. वैयक्तिक कर्जासोबत अन्य आर्थिक सवलती देण्याचा प्रयत्न सरकार व बॅंका हे करीत आहेत. सध्या सरकारने लॉकडाऊनमुळे प्रभावीत झालेल्या लोकांसाठी 1.7 लाख कोटी रूपयांची आर्थिक घोषणा केली आहे. असे विविध देश पर्यायी मार्गांचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.