कराची -पाकिस्तान सुपर लीग रद्द करून त्या वेळात आशिया करंडक स्पर्धा खेळवा व सप्टेंबर आणि ऑक्टोबरची विंडो आयपीएलसाठी राहावी यासाठी सहकार्य करण्याची बीसीसीआयने केलेली विनंती पाकिस्तान क्रिकेट मंडळाने फेटाळली आहे. यामुळे 5 हजार कोटींचा तोटा होऊ नये यासाठी आयपीएलचे आयोजन करण्याचा बीसीसीआयने चालवलेला खटाटोप वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
गुरुवारी बीसीसीआयने पाकिस्तान क्रिकेट मंडळाला याबाबत विनंती केली होती. त्यावर आगामी काळात भारतात होत असलेल्या आयसीसीच्या स्पर्धांसाठी पाकिस्तान संघाला व्हिसा मिळायला कोणतीही अडचण येणार नाही, अशी लेखी हमी देण्याची मागणी पाक मंडळाने बीसीसीआयला केली होती. त्यावर बीसीसीआयने कठोर शब्दांत ताशेरे ओढले होते. त्यामुळे पुन्हा एकदा या दोन संघटनांतील सुसंवाद वादात रूपांतरित झाला. त्यामुळेच पाक मंडळाने पाक सरकारच्या दडपणाखाली बीसीसीआयची विनंती फेटाळल्याचे संकेत मिळत आहेत. आशिया करंडक स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानला मिळालेले आहे. मात्र, दोन्ही देशांतील तणावामुळे भारतीय संघ पाकिस्तानात खेळू शकत नाही.
अशा स्थितीत ही स्पर्धा श्रीलंका किंवा अमिरातीत होण्याची शक्यता आहे. त्यातच पाक मंडळाने करोनाचा धोका वाढल्याने पाकिस्तान सुपर लीगचे उपांत्य फेरी व अंतिम फेरीचा सामना स्थगित केला होता. आता हे सामने खेळविण्यासह आशिया करंडकदेखील होणार असे ठाम मत पाक मंडळाने व्यक्त करत बीसीसीआयची विनंती फेटाळून लावल्याने आयपीएलचे आयोजन संकटात सापडले आहे.