आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमात दिल्ली कॅपिटल्स संघाचे फिजिओ पॅट्रिक फरहार्ट यांच्यापाठोपाठ मिशेल मार्श, टीम सेफर्ट हे दोन खेळाडू व सपोर्ट स्टाफमधील अन्य चार सदस्य करोनाबाधित असल्याचे समोर आले व खेळाडूंसह सर्वांच्याच पोटात गोळा आले. गेल्या वर्षीच्या मोसमात जे घडले त्याची पुनरावृत्ती यंदाही होणार का, अशी भीती प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली. खरेतर बीसीसीआयने आता यापुढे करोनाला हलक्यात घेऊ नये. कारण एक चूक संपूर्ण स्पर्धाला महागात पडेल.
फरहार्टनंतर दिल्लीचा खेळाडू मिशेल मार्शला करोनाची बाधा झाल्याचे समोर आले व त्याला रुग्णालयातही दाखल केले गेले. त्यानंतर सेफर्टही बाधित असल्याचे समोर आले व दिल्ली संघाच्या पायाखालची जमीनच सरकली. सपोर्ट स्टाफमधील डॉ. अभिजित साळवी, स्पोर्टस मसाज थेरपिस्ट चेतन कुमार, सोशल मीडिया कंटेन्ट सदस्य आकाश माने यांनाही करोनाची बाधा झाल्यामुळे केवळ दिल्लीच्याच नव्हे तर संपूर्ण स्पर्धेवरच सावट निर्माण झाले.
दिल्लीचा संघ पंजाबशी सामना खेळण्यासाठी पुण्यात येणार होता. मात्र, त्यांना मुंबईतच थांबवले गेले व हा सामनाच मुंबईत खेळवला गेला. हा सामना होणार का नाही याबाबत तर्कवितर्क होत होते. अखेर खेळाडूंची पुन्हा करण्यात आलेली आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आली व सामना खेळवला गेला. पण प्रश्न हा उरतो की या सर्व घडामोडीत बीसीसीआयची भूमिका काय होती.
तत्परतेची भूमिका होती का बघ्याची ते आता ठरवण्याची वेळ आली आहे. तसे पाहिले तर गेल्या वर्षी काही खेळाडू बाधित आढळल्यावर ही स्पर्धा स्थगित केली गेली व काही दिवसांनी उरलेले सामने अमिरातीत झाले. तीच वेळ यंदा येऊ नये यासाठी बीसीसीआयने तत्परता दाखवली असली तरीही ती खेळाडूंच्या सुरक्षेसाठी आहे का स्पर्धा पूर्ण करण्यासाठी असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कारण दिल्ली संघाबाबत जे समोर आले ते पाहिल्यावरही बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी ही स्पर्धा पूर्ण होणारच, अशी ग्वाही दिली ती देखील टीम सेफर्टचा अहवाल अल्यानंतर. म्हणजे यावेळी काहीही घडो ही स्पर्धा पूर्ण करणारच असा दृष्टिकोन यातून दिसला. असे होता कामा नये. ज्या बीसीसीआयला जागतिक क्रिकेटमधील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ मानले जाते ती श्रीमंती खेळाडूंमुळेच आली आहे. त्यामुळे सर्वात आधी विचार खेळाडूंचा, सुरक्षेचा व त्यांच्या जीवाचा केला गेला पाहीजे व नंतर स्पर्धांचा तसेच नफ्याचा केला गेला पाहिजे. नफेखोरीच्या नादात करोनाला आणि खेळाडूंच्या सुरक्षेला हलक्यात घेतले जाऊ नये हीच अपेक्षा आहे.