मुंबई – न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात होत असलेल्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी बीसीसीआयने शुक्रवारी भारतीय संघाची घोषणा केली. नियमित कर्णधार विराट कोहलीने पहिल्या कसोटीतून माघार गेतली असल्याने अजिंक्य रहाणेकडे नेतृत्व सोपवण्यात आले असून दुसऱ्या सामन्यात कोहली संघात परतणार असल्याने नेतृत्व तोच करणार असल्याचेही बीसीसीआयने जाहिर केले आहे. मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडची ही पहिलीच मालिका ठरणार आहे.
हिटमॅन रोहित शर्माला या कसोटी मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली असून तंत्रशुद्ध फलंदाज चेतेश्वर पुजाराकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. कानपूर कसोटीत रहाणे तर, मुंबई कसोटीत कोहली नेतृत्व करेल. या मालिकेसाठी वेगवान गोलंदाज द्वयी जसप्रीत बुमराह, महंमद शमी आणि यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत यांना विश्रांती देण्यात आली आहे. पंतच्या जागी वृद्धिमान साहा यष्टीरक्षण करेल. तर पर्यायी यष्टीरक्षक म्हणून के. एस. भरत याचा संघात समावेश करण्यात आला आहे.
न्यूझीलंड संघ आयसीसी टी-20 विश्वकरंडक स्पर्धा संपल्यावर लगेचच भारतात दाखल होणार आहे. या दौऱ्यात भारत व न्यूझीलंड यांच्यात तिन टी-20 सामन्यांची मालिकाही होणार आहे. त्यानंतर कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. टी-20 मालिकेतील सामने अनुक्रमे जयपूर (17 नोव्हेंबर), रांची (19 नोव्हेंबर) आणि कोलकाता (21 नोव्हेंबर) येथे होणार आहेत.
करोनामुळे भारतात गेल्या काही महिन्यात एकही मालिका झालेली नाही. याच धोक्यामुळे आयपीएल आणि भारताकडे यजमानपद असलेली टी-20 विश्वकरंडक स्पर्धा अमिरातीत खेळवली गेली.
या दौऱ्यापूर्वी बीसीसीआय नवीन सपोर्ट स्टाफचीही निवड करणार आहे. फलंदाजी प्रशिक्षक म्हणून विक्रम राठोड कायम राहण्याची शक्यता असून टी. दिलीप क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आणि पारस म्हांब्रे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून संघाशी जोडले जातील असे सांगण्यात येत आहे.
कसोटी सामन्यांचे वेळापत्रक
पहिला कसोटी सामना – 25 ते 29 नोव्हेंबर, कानपूर
दुसरा कसोटी सामना – 3 ते 7 डिसेंबर, मुंबई
भारताचा कसोटी संघ : अजिंक्य रहाणे (कर्णधार), लोकेश राहुल, मयंक आग्रवाल, चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), शुभमन गिल, श्रेयस अय्यर, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), के. एस. भरत (पर्यायी यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, अक्सर पटेल, जयंत यादव, इशांत शर्मा, उमेश यादव, महंमद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.