वंचित महिलांचं जगणं सुकर व्हावं, त्यांच्या जगण्यातले अडथळे दूर व्हावेत, यासाठी नियती फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा नियती विकास शिंदे धडाडीनं काम करत आहेत. महिलांच्या वेदनांवर फुंकर घालून त्यांना सक्षम बनवण्याचं काम करणाऱ्या नियती शिंदे यांच्याबद्दल…
“जगी ज्यास कोणी नाही,
त्यास देव आहे…’
हे गाणं तुम्ही कधी ना कधी ऐकलं असेल. यातला देव असतो, तो प्रत्यक्ष माणसातच! माणसंच माणसांना नाकारतात आणि माणसंच माणसांना स्वीकारतात. मात्र जे स्वीकारतात, ते नाकारणाऱ्यांसाठी साक्षात सर्वस्व बनतात. असंच काहीसं नियती विकास शिंदे यांच्याबाबतीत म्हणता येईल. त्यांची जीवनगाथा मोठी खडतर आहे. जगानं त्यांना नाकारलं. इतकं की त्यांचं जगणंच मुश्किल करून टाकलं. पण त्यांनी हार मानली नाही. त्या लढत राहिल्या. मात्र लढता लढता त्यांनी केवळ स्वतःचाच विचार केला नाही तर आपल्या सारख्याच निराधार महिलांना मायेनं जवळ केलं. त्यांना आधार देत त्यांच्यावर सावली धरली. इतकंच नाही तर अशा असंख्य निराधारांना आधार देण्यासाठी अलीकडेच त्यांनी नियती फाउंडेशनची स्थापनाही केली आहे.
मोठ्ठा पारंब्या असलेला वटवृक्ष हे नियती फाउंडेशनचं असलेलं बोधचिन्ह मोठं अर्थपूर्ण आहे. हे झाड म्हणजे नियती फाउंडेशन आहे आणि या झाडाच्या अंगाखांद्यावर समाजातले दुर्लक्षित घटक आहेत. या सगळ्यांना सावली देण्याचं काम करण्यासाठीच नियती फाउंडेशनची स्थापना केली असल्याचं नियती शिंदे यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केलं. ही त्यांची भूमिका त्यांच्या जगण्यातून घडत गेली असल्याचं त्यांच्याशी बोलताना पदोपदी जाणवतं. त्यांच्या आयुष्याची गोष्ट ऐकवत नाही, इतकी वेदनादायक आहे. नियती शिंदे मूळच्या ओरिसामधल्या. त्यांच्या आईला दहा मुली. त्यांचा जन्म झाला आणि हीसुद्धा मुलगी आहे, असं लक्षात आल्यावर त्यांना आईनं फेकून दिलं. किन्नर असलेल्या मनीषाताई यांनी त्यांचा सांभाळ केला. मात्र त्यांचीही परिस्थिती फारशी चांगली नसल्यानं त्यांनी लहानग्या नियतीला जेवायला कसं घालायचं, हा प्रश्न उभा राहिला. त्यांचा प्रभाकर नावाचा भाऊ होता. तो आळंदीत असायचा. त्याला लहान्या नियतीची दया आली आणि तो तिला 6-7 वर्षाची असताना आळंदीत घेऊन गेला.
आळंदी नियतीसाठी परकं गाव. पण या गावाला आपलंसं करत, धुणं-भांड्याची कामं करत नियती लहानाची मोठी होऊ लागली. पडेल ते काम करत मोठी होऊ लागली. आता सगळं काही सुरळीत होईल असं वाटत असतानाच विपरीत घडलं.
नियती 13 वर्षाची असताना तिचं भरत नावाच्या माणसाशी लग्न लावून देण्यात आलं. पण प्रत्यक्षात तिला साडेचार लाख रुपये घेऊन विकण्यात आलं होतं. याचा उलगडा नियतीला नंतर झाला, जेव्हा भरत तिला गुजरातमध्ये घेऊन गेला तेव्हा! तेव्हा नियतीच्या पायाखालची जमीनच सरकली. तिनं तिथून पळ काढला आणि शेख नावाच्या एका भल्या माणसाची तिची भेट झाली. या माणसाला सगळी कहाणी समजल्यावर त्यानं तिला आश्रय दिला. मात्र अखेर भरतनं नियतीचा पत्ता शोधून काढला आणि “ही माझी बायको आहे,’ म्हणून नियतीला घेऊन जाऊ लागला. मात्र त्याला शेख यांनी विरोध करत, तूही आमच्याकडे राहा, असं सुचवलं. दोघंही वेगवेगळं त्यांच्याच घरी राहू लागले.
सहा महिने झाल्यानंतर शेख यांना भरत चांगला माणूस वाटला म्हणून त्यांनी नियतीला “भरत सोबत आता तू राहा,’ असं सुचवलं. पण प्रत्यक्षात त्यानं चांगलं असण्याचं ढोंग केलं. सोबत राहू लागल्यावर लगेचच नियती गरोदर राहिली. सात महिन्याची गरोदर असताना भरत पळून गेला, तो पुन्हा आलाच नाही. नियती तशाच ओडिसाला गेल्या. तिथं बहिणीकडे राहिल्या. पण हिला मुलगी झाली तर ती आपल्यालाच सांभाळावी लागेल, या भीतीनं एका महिन्यानं तिनंही थारा दिला नाही. शेवटी एका झाडाखाली नियतीला बाळंतपण घडलं. मग तीन महिन्यानंतर कसे बसे 160 रुपये गोळा करून मुलासह नियती पुन्हा आळंदीत परतल्या.
त्यानंतरचा प्रवास सांगताना नियती म्हणतात, “तेव्हाचे नगरसेवक रामभाऊ भोसले यांनी मला त्यावेळी मदत केली. सोबत काही आवश्यक त्या वस्तूही दिल्या. एकटी बाई म्हणून लोक तेव्हा खूप वाईट नजरेनं पाहायचे. दरम्यानच्या काळात शिवणकाम शिकले. ब्युटीपार्लरचा कोर्स केला. पडेल ती कामे केली. ती करताना माझ्या वाट्याला जे आलं ते कुणाच्या वाट्याला येऊ नये यासाठी अडचणीत असलेल्या महिलांना मदत करायला सुरुवात केली. त्याच दरम्यान एका मॉलचं हाऊस किपिंगचं काम मिळालं. त्यासाठी चौघीजणींना मी गोळा केलं. महिना 6000 रुपये मिळायचे. हे पैसे साठवून स्वतःचं शिलाईमशीन घेतलं आणि पार्लरही सुरू केलं. कष्ट करत गेले तशी परिस्थिती बदलत गेली.
नियती शिंदे यांच्या अनेक मैत्रिणी किन्नर आहेत. त्यामुळं त्यांना खूप वेळा आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं गेलं. नाही नाही ते ऐकावं लागलं. पण डगमगून न जाता त्यांनी आपला प्रवास सुरूच ठेवला. आज त्यांच्या घरी 30 हून अधिक किन्नर महिला वास्तव्यास आहेत. त्यामुळे आजूबाजूच्या रहिवाशी सातत्यानं तक्रार करत असतात. पण या महिलांकडेही माणूस म्हणून का पाहिलं जात नाही, असा नियती यांचा प्रश्न आहे. किन्नर महिलांची मदत केल्यानं त्यांचं आयुष्य बदलतं, याच्या त्या स्वतः साक्षीदार आहेत. याशिवाय अनेक महिला अशा असतात की त्यांना घरून वेगवेगळ्या कारणांनी त्रास दिला जातो. कधी मुलगा होत नाही म्हणून… कधी लग्न ठरत नाही म्हणून… कधी नवऱ्याचा मृत्यू झाला म्हणून… कधी वय झालं म्हणून… या सगळ्याच महिलांना आधार देणारं हक्काचं घर म्हणजे नियती फाउंडेशन अशी ओळख आता हळूहळू निर्माण होत आहे.
हे सगळं काम करण्यात त्यांना मोलाची साथ मिळाली ती त्यांच्या नवऱ्याची. 2004 मध्ये त्यांचं विकास शिंदे यांच्याशी दुसरं लग्न झालं. विकास शिंदे यांनी नियती यांच्या मुलाचा स्वीकार केलाच पण त्यांच्या कामालाही पाठिंबा दिला. त्यांचा मुलगा राजेशही आता मोठा झाला असून त्याच्यातही सामाजिक जाणीव विकसित झाली आहे.
वर्षाला 7-8 लग्न मोफत!
नियती शिंदे यांना स्वतःच्या लग्नाचा खूप वाईट अनुभव आला. त्यांना फसवलं गेलं. लग्नाचं आमीष दाखवून फसवण्याची प्रवृत्ती समाजात वाढत असून त्याला आळा घालण्यासाठी नियती फाउंडेशननं आता पुढाकार घेतला आहे. दरवर्षी ते लग्न लावण्यात येतात. ही संख्या भविष्यात पर्यंत न्यायची आहे, असंही नियती शिंदे यांनी सांगितलं.
निवडणूक लढवायची नाही…
नियती शिंदे यांच्या कामाचा हळूहळू वाढत असलेला विस्तार आणि त्यांना मिळत असलेला लोकांचा प्रतिसाद पाहून अनेकांना त्या भावी काळात निवडणूक लढविणार आहेत, याबाजूनं चर्चा रंगली आहे. मात्र निवडणुकीत मला कोणतंही स्वारस्य नाही, मला फक्त अडीअडचणीत असलेल्या लोकांना मदत करायची आहे, अशी त्यांची ठाम भूमिका आहे.
नियती फाउंडेशनच्या माध्यमातून कार्यरत असणाऱ्या नियती शिंदे यांना त्यांच्या कामाची मशाल कधीही थंड होऊ द्यायची नाही. त्यासाठी त्यांचे प्रयतक् सुरू आहेत. लोकांनी महिलांकडे वाईट नजरेनं पाहू नये, आळंदीला आम्ही आमचं मानतो, त्यामुळं आम्ही बाहेरगावचे आहोत, असं बोलून हिणवू नये. माऊलींनी हे विश्वची माझे घर असा संदेश दिला, त्याच आळंदीत बाहेरचे म्हणून हिणवलं जातं, तेव्हा खूप वाईट वाटतं, अशी खंतही नियतीताई व्यक्त करतात. महिलांना मुलगी-बहीण आणि आई म्हणून सन्मानाची आणि आदराची वागणूक मिळाली पाहिजे, याच ध्येयानं त्या कार्यरत आहेत आणि खऱ्या अर्थानं निराधारांच्या आधार होऊन त्यांना मायेची सावली देण्याचं मोलाचं काम करत आहेत.
कामाचा विस्तारता परीघ
नियती शिंदे यांच्या कामाचा परीघ आता केवळ महिलांपुरताच राहिलेला नाही, तर त्याचे सामाजिक कामात रुपांतर होत आहे. गरजू व्यक्तींचे पॅनकार्ड, आधारकार्ड बनविणे, गरजूंना हवी ती मदत करणे, पैशांअभावी शिक्षण घेण्यात अडचण येत असेल तर विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणे, भूमिहीन महिलांना जमिनी मिळवून देण्यासाठी आवश्यक तो पाठपुरावा करणे, बचत गटांद्वारे महिलांच्या कौशल्याला चालना देऊन त्यांचं सक्षमीकरण करणे अशा विविध पातळ्यांवर नियती शिंदे सध्या कार्यरत आहेत. त्यांच्या कामाचा झपाटा पाहून आरपीआयच्या पश्चिम महाराष्ट्र व्यापारी आघाडीचं अध्यक्षपदही त्यांना मिळालं आहे. त्या माध्यमातूनही त्या सक्रियपणे कार्यरत आहेत.
नियती फाउंडेशनचं काम
आदिवासी व मागास/दुर्गम भागात आश्रमशाळेची उभारणी करून सैनिकी व भरतीपूर्व प्रशिक्षण देणे.
तृतीयपंथियांचं पुनर्वसन करणे व त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देणे.
अनाथ मुले, विधवा, अपंग, मूकबधीर, निराधार वृद्ध यांचं पुनर्वसन व संरक्षण करण्यासाठी अनाथालय, आश्रम, मूकबधीर विद्यालय, वृद्धाश्रम, सुधारगृहांची स्थापना करणे.
कंपन्यांमधील कामगार वर्गाचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेणे.
मराठी, हिंदी, इंग्रजी व उर्दू भाषेतील शिक्षणसंस्था सुरू करून ज्ञानदानाचं काम करणे.
आधुनिक शेती व तंत्रज्ञानाबद्दल शेतकऱ्यांना माहिती देणे.
अभ्यासिका व ग्रंथालये सुरू करणे.
शिक्षण, आरोग्य आणि सर्वांगीण विकासावर भर देणे.
नियतीच्या रणरागिणी
शुभांगी शिंदे । कोमल झुंजारे । रेखा कळस्कार । मीरा नागरगोजे । कावेरी आंधळे । मीनाक्षी राजगुरू । लखमी शांता रणक्षत्रे । छाया डोकरे । उज्ज्वला भंगाळे । सपनाताई म्हस्के । अंजना नागरगोजे । अनुराधा तेलंग यासह अन्य.
नियती शिंदे : ठळक
चऱ्होली ग्रामपंचायत ते शांताई नगर 100 मीटरचा रस्ता आणि ड्रेनेजलाईनचे काम केले.
महाराष्ट्र रणरागिणी पुरस्कार प्राप्त
वर्षातून चार वेळा गरजू महिलांना साडी वाटप
दिवाळीत गरजू कुटुंबांना रेशन वाटप
आळंदी भाजी मंडईच्या अतिक्रमणाचा प्रश्न सोडवला.
महिला बचत गटांची स्थापना.