आंबेगाव बुद्रुक –महानगरपालिकेमध्ये समावेश होऊन चार वर्षांपेक्षा जास्त कालावधी होऊनही आंबेगावातील नागरिकांना स्थानिक लोकनेतृत्वच मिळाले नसल्याने या भागाचा विकास खुंटला आहे. 2017 मध्ये नव्याने समाविष्ट 11 गावांसाठी दोन नगरसेवक देण्यात आले; परंतु नगरसेवक “बाहेर’चे असल्याने या भागाच्या विकासाकडे त्यांनी लक्षच दिले नाही. 2022च्या निवडणुकीत तरी आंबेगावला स्थानिक लोकनेतृत्व मिळेल आणि येथील प्रश्न सुटतील, अशी अशा असताना पालिकेची निवडणूकच लांबणीवर पडली आहे. त्यामुळे गाव महापालिकेत पण नगरसेवकच नसल्याची भावना आंबेगावातील नागरिकांची झाली असून पालिकेवर नियुक्त प्रशासकांनी तरी येथील समस्यांकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
महापालिकेचे अर्थातच नगरसेवक नसल्यामुळे आंबेगावच्या मूलभूत विकासाकडे दुर्लक्ष झाले आहे. 2022 मध्ये निवडणुकीत येथील स्थानिक नगरसेवक निवडून येईल, अशी अपेक्षा असताना निवडणूकच लांबणीवर पडली आहे. त्यातच, सध्या आंबेगावातील अंतर्गत रस्त्यांवर खड्डे, कचरा, आरोग्य, शिक्षण अशा समस्या कायम आहेत. या भागाला नेतृत्वच नसल्याने समस्या मांडायच्या तरी कोणाकडे, अशा प्रश्न निर्माण झाला आहे. निवडणुकीसाठी “तयारी’ करणारेही आता “गायब’ झाले आहेत.
आंबेगाव बु. गावठाणच्या समस्या सोडवण्यासाठी पालिकेने जास्तीत जास्त निधी मंजूर करणे तसेच या भागातील रस्ते, पाणी, वीज, उद्याने आदी समस्या लवकरच सुटाव्यात अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. यासाठी आगामी महानगरपालिका निवडणुकीत स्थानिक नेतृत्वाला संधी देण्याविषयी नागरिकांत चर्चा असून सध्या तरी महापालिकेच्या प्रशासकांनी समस्यांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
गेली दोन वर्षापासून करोना संसर्ग यामुळे अनेक उद्योगधंदे बुडीत अवस्थेत आहे. आता कुठे उद्योग-व्यावसाय सुरळीत झालेले असताना महापालिका प्रशासनामार्फत अयोग्य कारवाई होत आहे. प्रशासकीय राज दाखविण्यासाठी अतिक्रमणांवर कारवाई करण्यापेक्षा नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवाव्यात. – अनिल कोंढरे, माजी उपसरपंच, आंबेगाव बु.