मुंबई – देशाच्या घाऊक महागाईच्या वार्षिक दराने (WPI) तीस वर्षांतील उच्चांक गाठला आहे. मार्च 2022 मध्ये हा दर 14.55 टक्क्यांवर गेला आहे. याचा अर्थ असा की, जे आम्हाला म्हणाले की भारतामध्ये जे साठ वर्षांमध्ये झाले नाही ते करून दाखवू, निश्चितच त्यांनी हे करून दाखवलं, असा उपरोधिक टोला महेश तपासे यांना लगावला.
गेल्या तीस वर्षात इतकी महागाई नव्हती. घाऊक महागाई दर हा 14.55 टक्क्यांवर गेला आहे आणि लोकांचे दरडोई उत्पन्न खालावलेले आहे. महागाईसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यावरून लोकांचं लक्ष विचलित व्हावं म्हणूनच जातीपातीचं राजकारण केलं जात आहे. आज महागाईमुळे सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. देशाच्या पंतप्रधानांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घ्यायला हवी आणि लोकांशी संवाद साधून आपली भूमिका मांडावी. मात्र तसे न करता, रामनवमी आणि हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर ज्या दंगली झाल्या त्या दंगलींच्या पाठीमागून आपले अपयश लपवण्याचे हे षडयंत्र आहे का? असा संशय तपासे यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी बुधवारी विविध विषयांवर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर सडकून टीका केली.
वकील गुणरत्न सदावर्ते यांनी 90 हजार एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लावतो, एसटी महामंडळाचं विलिनीकरण राज्य शासनामध्ये करतो, अशी खोटं आश्वासनं देऊन एसटी कर्मचाऱ्यांच्या भावनांशी खेळ केला. शरद पवार यांच्या घरावर हल्ला होण्याआधीही गुणरत्न सदावर्ते यांच्या घराच्या गच्चीवर बैठका झाल्या होत्या, अशी आम्हाला माहिती मिळाली आहे. आता त्यातील लोक स्वत:हून बाहेर येऊन पोलिस प्रशासन व प्रसार माध्यमांना माहिती देत आहेत. एक धक्कादायक बातमी अशी बाहेर आली की, एसटी कर्मचाऱ्यांकडून कोटयवधी रूपये गोळा करण्यात आले. सदावर्ते यांच्या घरामध्ये पैसे मोजण्याची मशीनसुद्धा सापडली आहे. जर ते पैसे एसटी कर्मचाऱ्यांच्या मुलांना अथवा मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना दिले असते तर आम्ही समजून घेतलं असतं, मात्र त्या पैशातून आलिशान गाड्या आणि मुंबईमध्ये दोन ठिकाणी प्रॉपर्टीज घेण्यात आल्या, अशी माहिती तपासे यांनी दिली.
आम आदमी पार्टीच्या प्रदेशाध्यक्षांनी शरद पवार यांना एक पत्र पाठवलं आहे. त्या पत्रामध्ये देशामध्ये सध्या जे धार्मिक ध्रुवीकरणाचे राजकारण सुरु आहे त्यासंदर्भात शरद पवार यांनी आवाज उठवावा अशी विनंती त्यांनी केली आहे.
देशातील धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्रित येऊन भारतीय संविधानाचे रक्षण केले पाहिजे, अशी भूमिका शरद पवार हे नेहमीच घेत आलेले आहेत. त्यांच्या या भूमिकेला ममता बॅनर्जी व अरविंद केजरीवाल यांनीसुद्धा साथ दिली आहे. तसेच काँग्रेस पक्षाकडूनही या भूमिकेला साथ मिळत आहे. त्यामुळे एकंदरीतच देशामध्ये भाजपविरोधी संघटन निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. तो दिवस आता लांब नाही जेव्हा केंद्रात पुन्हा एकदा युपीएचे सरकार अस्तित्वात येईल, अशी आशा तपासे यांनी व्यक्त केली.