सातारा – अंजली कॉलनी व गेंडामाळ नाका परिसरातील प्रतिबंधित क्षेत्राचे नियम जिल्हाधिकाऱ्यांनी शिथिल केले. मात्र, पालिका प्रशासनाने गेंडामाळ नाका परिसरातील काही घरालगतचे बॅरिकेटिंग न काढल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पुरेपूर अंमलबजावणी न करता मनमानी करणाऱ्या नगरपालिका प्रशासनाचा दुजाभाव पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. पालिकेच्या या लाल फितीच्या कारभाराबद्दल नाराजीही व्यक्त होत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शुक्रवारी सायंकाळी सातनंतर गेंडामाळ नाका, अंजली कॉलनी या भागातील कंटेनमेंट झोन शिथिल केल्याची अधिकृत सूचना संबंधित सर्वांनाच मिळाली. मात्र, एक अजब घटना या भागात पाहायला मिळाली. या भागातील मुख्य रस्ता आणि गजानन महाराज मंदिर ते अंजली कॉलनी आणि महत्वाचा म्हणजे वरद विनायक सोसायटीचा प्रतिबंधित केलेला रस्ता कळक काढून मोकळा करण्यात आला. कंटनन्मेंट झोन पूर्ण भागासाठी असताना फक्त अंजली कॉलनी रस्ता, राजवाडा रस्ता, वरद विनायक कॉलनीसाठी मोकळा केला गेला आणि गेंडामाळ नाका भागातील कळक तसेच ठेवले आहेत.
कंटनमेंट झोन पूर्ण उठवण्यात आलेला असताना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची सातारा पालिकेने तंतोतंत अंमलबजावणी केली नाही, याबद्दल लोक संताप व्यक्त करीत आहेत. वरदविनायक सोसायटीही गेंडामाळ नाक्याला जोडून आहे. मग एका परिसराला एक न्याय आणि एकाला दुसरा न्याय असा पालिकेचा हा दुटप्पी कारभार येथील नागरिकांच्या पचनी पडलेला नाही. कंटेनमेंट झोन जाहीर झाल्यानंतर बाधित क्षेत्र एकीकडे आणि पालिकेची औषध फवारणी व्हीआयपी कॉलनीमध्ये असा प्रकारही झाला होता. “प्रभात’ने पालिकेच्या या कारभाराची पोलखोल केली होती. आणि आताही जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी व्यवस्थित केलेली नाही. या संदर्भात मुख्याधिकारी शंकर गोरे व उपमुख्याधिकारी संचित धुमाळ यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते उपलब्ध झाले नाहीत.