भूमी अभिलेख विभागांशी करार करून घेण्याच्या सूचना
पुणे – जमिनींवर कर्ज घेताना सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी बॅंकांना आता ऑनलाइन करता येणार आहे. त्यासाठी राज्यातील सर्व बॅंकांना भूमी अभिलेख विभागाकडून ऑनलाइन सातबारा उतारा, खाते उतारा आणि फेरफार उताऱ्याची माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासाठी राज्यातील सर्व बॅंकांनी येत्या 31 मेपूर्वी भूमी अभिलेख विभागांशी करार करून घ्यावा, अशा सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत.
भूमी अभिलेख विभागाकडून राज्यातील सातबारा उतारा संगणकीकरणाचे काम जवळपास 98 टक्के पूर्ण झाले आहे. हे उतारा उतारे डिजिटल स्वाक्षरी असलेले आहेत. अनेकदा जमिनींवर कर्ज काढण्यासाठी अथवा अन्य स्वरूपाचे कर्ज बॅंकांकडून घेण्यासाठी सातबारा उतारा, खातेउतारा यांची मागणी होते. अशावेळेस ते काढण्यासाठी तलाठ्याच्या कार्यालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. तर काहीवेळेस बनावट कागदपत्रे सादर करून बॅंकेची फसवणूकदेखील केली जाते.
राज्याचे मुख्य सचिव अजेय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक मुंबई येथे झाली. यामध्ये भूमी अभिलेख विभागाचे वेब पोर्टल बॅंकांना उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या होत्या. कर्ज प्रकरणासाठी अर्ज दाखल झाल्यानंतर त्यासोबत जमिनीशी संबंधित सातबारा उतारा, खातेउतारा आणि फेरफार उतारा जोडला जातो. त्यांची पडताळणी ऑनलाइन करणे बॅंकांना सोपे होणार आहे. तसेच कर्जदारांनादेखील त्यासाठी तलाठी कार्यालयाच्या हेलपाटे मारण्याची गरज राहणार नाही.
ऑनलाइन सातबारा उतारा उपलब्ध करून घेण्यासाठी राज्यातील सर्व बॅंकांना 31 मेपर्यंतची मुदत दिली आहे. आतापर्यंत सहा बॅंकांनी भूमी अभिलेख विभागाशी अशाप्रकारे करार केला आहे. त्यामुळे बॅंका आणि खातेदार या दोघांच्या वेळेची बचत होणार आहे.
– रामदास जगताप, उपजिल्हाधिकारी