एखाद्या गावाची किंवा परिसराची ओळख जशी तेथील राजकीय किंवा सामाजिक कार्यकर्त्यांमुळे असते, तशीच ती तेथील लेखक कवींमुळेही असते. आता हेच पाहा ना, सोलापूर शहराची ओळख जशी तेथील चार हुतात्म्यांमुळे आहे तशीच ती शाहीर राम जोशींमुळेही आहे. अलीकडच्या काळातली श्रीराम पुजारी, लक्ष्मी नारायण बोल्ली, दत्ता हलसगीकर, समीक्षक गो. मा. पवार, रा. ना. पवार, नरेंद्र कुंटे, विजयाताई जहागिरदार ही सोलापुरातील प्रसिद्ध नावे. त्यातीलच एक प्रसिद्ध राजकीय नाव म्हणजे सुशीलकुमार शिंदे तर ठसठशीत प्रसिद्ध असलेलं लेखकीय नाव म्हणजे डॉ. निर्मलकुमार फडकुले!
फडकुले सर उत्कृष्ट अध्यापक होते, कसदार लेखक होते आणि बहारदार वक्ते होते. म्हणूनच सोलापूरकरांनी त्यांची स्मृती जपलीय. 2007 साली त्यांच्या नावाने एक प्रतिष्ठान स्थापन करून त्या प्रतिष्ठानमार्फत सभागृहही बांधलेय. त्या सभागृहाला अर्थातच फडकुले सरांचे नाव दिलेय. सिद्धेश्वर मंदिराजवळच हे प्रशस्त सभागृह आहे. तळघरात विविध प्रदर्शने भरवली जातात आणि सभागृहात अनेक वैचारिक, सांस्कृतिक कार्यक्रम पार पडतात. 630 आसनक्षमता असलेलं हे सभागृह म्हणजे सोलापूरकरांचे सांस्कृतिक वैभव आहे.
फडकुले सरांनी साहित्यवेध, काही रंग काही रेषा, हिरव्या वाटा, आनंदाची डहाळी, जगायचं कशासाठी?, रंग एकेकाचे, संत सहवास, संताचिया भेटी अशी जवळपास 23 पुस्तके लिहिली. त्यातील 13 पुस्तकांचे प्रकाशन सोलापूरच्या सुविद्या प्रकाशनचे प्रमुख बाबुराव मैंदर्गीकर यांनी केलेय. फडकुले सरांनी “ज्ञानेश्वरीः अध्याय पहिला, चिपळूणकरांचे तीन निबंध, यांत्रिक, प्रबोधनातील पाऊलखुणा यांसारखी सात पुस्तके संपादित केली आहेत. सुशीलकुमार शिंदे, प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, हे एकेकाळचे सरांचे विद्यार्थी.
2009 साली फडकुले सरांचे निधन झाले. त्यांचा देह अग्नीनारायणाच्या स्वाधीन झाला; पण त्यांचे विचारधन शब्दरुपाने शिल्लक आहेत. लोककवी मनमोहन लेखक कवींबद्दल म्हणतात-
“”शव तयाचे जाळू नका हो
जीवनभरी तो जळतच होता,
फुले तयावर उधळू नका हो,
जीवनभरी तो फुलतची होता.”
फडकुले सर हयातभर फुलतच होते आणि आपल्या हजारो विद्यार्थ्यांना विचारांनी फुलवीत होते. म्हणूनच त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दरवर्षी दोन कार्यकर्त्यांना प्रत्येकी पंचवीस हजार रुपयांचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. त्यातील एक पुरस्कार सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी असतो; तर दुसरा पुरस्कार साहित्य क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या लेखक कवींसाठी असतो.
एका वर्षी साहित्य सेवेबद्दलचा हा पुरस्कार पुण्यात राहणाऱ्या डॉ. अनिल अवचट यांना जाहीर झाला. त्यांचे व्यसनमुक्तीचे काम जसे स्पृहणीय आहे तसेच प्रबोधनात्मक वैचारिक लेखनही कसदार आहे. म्हणून प्रतिष्ठानतर्फे पुरस्कार स्वीकारण्यासाठी डॉ. अनिल अवचट सरांना आणण्याची जबाबदारी प्रतिष्ठानचे एक सदस्य प्रा. माधव राजगुरू यांच्यावर सोपवण्यात आली. प्रा. माधव राजगुरू पुण्यातच राहात असल्यामुळे त्यांनी ती जबाबदारी आनंदाने स्वीकारली.
डॉ. अनिल अवचट यांना रीतसर निमंत्रणपत्रिका पाठविण्यात आली. कार्यक्रमाचा दिवस आणि वेळ निश्चित होती. कार्यक्रमाचे स्थळ अर्थातच “फडकुले सभागृह’ हेच होते. म्हणून कार्यक्रमाच्या अगोदर दोन दिवस प्रा. माधव राजगुरू यांनी अवचट सरांना फोन केला. फोनवर राजगुरू म्हणाले,
“”अवचट सर, मी माधव राजगुरू बोलतोय. मी निर्मलकुमार फडकुले प्रतिष्ठानचा सदस्य आहे. तुम्हाला सोलापूरला नेण्या-आणण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवलीय. त्यासाठी मी गाडी ठरवलीय. तर कार्यक्रमासाठी आपण कुठून निघायचं हे विचारण्यासाठी फोन केलाय.”
त्यावर अवचट सर म्हणाले, “”तुमच्याबरोबर अजून कुणाला घेतलंय का?”
“”नाही. मी एकटाच ड्रायव्हरला घेऊन येणार आहे, पण गाडीत जागा आहे. तुम्हाला अजून कुणाला सोबत घ्यायचं असेल तर घ्या.” राजगुरूंचे हे बोलणे ऐकल्यावर डॉ. अनिल अवचट सर नम्रपणे म्हणाले, “”हे बघा राजगुरू सर, वाईट वाटून घेऊ नका. पण तुम्हाला विनंती आहे की, तुम्हीही माझ्याबरोबर येऊ नका. फक्त ड्रायव्हरला गाडी घेऊन पाठवा. त्यांना माझा पत्ता आणि फोन नंबर द्या आणि मलाही गाडी नंबर सांगा.” त्यावर राजगुरू सर म्हणाले, “”माझ्यामुळे तुमची काही अडचण होणार आहे का?” “”प्रश्न अडचणीचा नाही. पण सोबत मनुष्य असला की तो नको तितक्या गप्पा मारतो. खासगी संभाषण करतो आणि मला तेथे जाऊन सत्काराला उत्तर द्यायचंय. त्या उत्तराचं चिंतन करायला मला वेळ हवाय आणि निवांतपणाही हवाय. म्हणून म्हणतो…”
“”ठीक आहे सर. तुम्ही एकटेच गाडीत जा. मी ड्रायव्हरला तुमचा पत्ता आणि फोन नंबर देतो. तो बरोबर वेळेत येईल. काळजी करू नका. काही अडचण आली तर मला कळवा. प्रवासासाठी तुम्हाला शुभेच्छा आणि पुरस्कार मिळाल्याबद्दल पुनश्च एकदा हार्दिक अभिनंदन!” थोडक्यात काय, तर वक्त्याला त्याचे वक्तृत्व बहरण्यासाठी जसा समोर जाणता श्रोतृवर्ग हवा असतो, तसा चिंतन मननासाठी एकांतही हवा असतो. वाचन, लेखन, चिंतन, मनन या मनोबल वाढविणाऱ्या गोष्टी आहेत.
डॉ. दिलीप गरूड