पुणे – पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष बदलाच्या हालचाली, पक्ष प्रभारींची मुंबई भेट अशा राज्यस्तरावर घडणाऱ्या घडामोडींकडे शहरातील कॉंग्रेसजनांचे लक्ष लागले आहे. याबाबत काय निर्णय होतो, याकडे याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्कंठा वाढली आहे.
कॉंग्रेस पक्षाचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात दिल्ली भेटीला गेले, तिथे ते अध्यक्षपदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे सादर करतील अशा बातम्या आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून थोरात यांना बदलणार असे ऐकू येत होते. तर, खुद्द थोरातच राजीनाम्याच्या तयारीत होते, असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगितले गेले.
थोरात यांच्या अध्यक्षपदाबाबत येत्या दोन दिवसात अंतिम निर्णय होईल. दरम्यान, आमदारांच्या भेटी घेऊन पक्ष संघटना आणि महाविकास आघाडी सरकारचा कारभार या विषयी आढावा घेण्यासाठी पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी एस.के. पाटील मुंबईत आले आहेत.
औरंगाबादचे नांव बदलण्यास विरोध असल्याचे विधान बाळासाहेब थोरात यांनी केले आणि ते प्रथमच वादात सापडले. औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. “औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करावे,’ अशी मागणी भाजपने उचलून धरली आहे.
त्याचदरम्यान अध्यक्ष बदलाच्या हालचालींनी वेग घेतला आहे. कॉंग्रेस पक्षाच्या घटनेनुसार प्रदेश अध्यक्ष बदलले की जिल्हा कमिट्याही बदलल्या जातात. त्यामुळे अधिक लक्ष आहे. अध्यक्षपदासाठी नाना पटोले, यशोमती ठाकूर, राजीव सातव आणि अशोक चव्हाण यांची नांवे आहेत.
यापैकी जो अध्यक्ष होईल, त्याच्या निकटवर्तीयांच्या शहराध्यक्ष होण्याच्या शक्यता वाढतात. चव्हाण आणि पटोले यांना पुण्यात समर्थक आहेत. ठाकूर आणि सातव यांना पुण्यात कट्टर समर्थक नाहीत, परंतु दोघेही खासदार राहुल गांधी यांच्या विश्वासूंपैकी असल्याने संघटनेवर त्यांचा दबदबा राहील. राहुल गांधी यांच्या कामगिरीत सातत्य हवे असे विधान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मध्यंतरी केले होते.
त्यावर नाराजीची प्रतिक्रिया यशोमती ठाकुर यांनी दिली होती. तर आघाडीमध्ये कॉंग्रेस पक्षाला गृहीत धरून काम केले जाऊ नये, अशा शब्दांत अशोक चव्हाण यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेला ठणकावले होते. त्यामुळे या दोघांपैकी कोणी प्रदेशाध्यक्ष झाल्यास कॉंग्रेस अधिक आक्रमक राहील.
पुण्याचा निर्णय आताच होणार का?
पुढील वर्षाच्या सुरूवातीला पुणे महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्याही कारणाने पुण्यातील संघटनेत बदल करायचा की नाही याचा निर्णय पक्षाला आताच घ्यावा लागणार आहे. उमेदवारीची यादी करताना अध्यक्षपदावरील व्यक्तिला महत्व असते. यामुळे पालिका निवडणुकीतील इच्छुकांचे अशा घडामोडींकडे लक्ष अधिकच आहे. गेल्या दोन, तीन महिन्यांपासून पुणे शहरातही अध्यक्ष बदलाचे वारे अधुनमधून वाहत असते. काही इच्छुकांनी तयारीही केली आहे. नववर्षाचा पहिला पंधरवडा कॉंग्रेस पक्षासाठी धामधुमीचा आहे.