मांडवगण फराटा -देशात व राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने चार लॉकडाऊन घेण्यात आले. या लॉकडाऊन काळात शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात ग्रामपंचायतीकडून करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या;
परंतु 18 मे नंतर मात्र सुरवातीच्या काळात काळजी घेणारे घरात बसणारे नियमांचे काटेकोर पालन करणारे ग्रामीण भागातील नागरिक आता बेफिकीरीने वावरताना दिसत आहेत त्यामुळे ग्रामीण भागातील वातावरण सध्या खुल्लमखुल्ला असेच दिसत आहे.
करोनाचा धोका संपलेला नाही हे या मंडळींना सांगणार तरी कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील काही गावांमधील वातावरण पहिल्याप्रमाणे पाहावयास मिळत आहे. हे खुल्लमखुल्ला वातावरण पाहिल्यावर असे वाटते की, करोनाचा संसर्ग धोका टळला की काय? सध्या गावागावात सकाळी व संध्याकाळी चौकाचौकात ग्रामस्थ मोठी गर्दी करताना दिसत आहेत. जवळजवळ बसून गप्पा ठोकत आहेत.
किराणा मालाच्या दुकानातील गर्दी, भाजीपाला खरेदीसाठी होणारी गर्दी आणि गावातील पेठांमध्ये गर्दी करणाऱ्या नागरिकांना सध्या फिजिकल डिस्टन्सचा विसर पडला आहे. गर्दीच्या ठिकाणी कोणीही तोंडावर मास्क किंवा रुमाल बांधत नसल्याची वस्तुस्थिती आहे.
गावागावात बाहेरून येणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे; परंतु काही गावांमध्ये बाहेरून येणाऱ्या लोकांना क्वारंटाइन करूनही ते ग्रामस्थ गावांमध्ये बिनधास्त फिरताना दिसत आहेत.
त्यामुळे गावांचा धोका वाढत चालला असून, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बाहेरून आलेले नागरिक गावात फिरत आहेत तर दुसरीकडे गावातील नागरिक गर्दी करून त्यात लोकांबरोबर बसत आहे. त्यामुळे करोनाचाधोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.