जम्मू : काँग्रेसचे जेष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी आज आपल्या पक्षाच्या जाहीरनाम्यावर भाजप नेत्यांकडून सुरु असलेल्या टीकेला प्रतिउत्तर दिले. काँग्रेसकडून आगामी लोकसभा निवडणुकांसाठी आपला जाहीरनामा सादर केल्यापासून भाजप नेत्यांनी काँग्रेसवर देशाचे तुकडे करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला जात आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये सैन्य दलांना विशेष अधिकार देणाऱ्या AFSPA कायद्यामध्ये संशोधन केले जाईल असे आश्वासन देण्यात आले असून याच मुद्द्यावरून भाजपचे नेते सध्या काँग्रेसवर निशाणा साधत आहेत.
दरम्यान, आज काँग्रेसचे जेष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी AFSPA कायद्याबाबत काँग्रेसच्या भूमिकेवर स्पष्टीकरण दिले असून ते म्हणतात, “AFSPA कायद्यामध्ये संशोधन केल्याने सैन्य दलांचे स्वातंत्र्य नक्कीच कमी होणार नाही मात्र सैन्य दलांच्या कारवाईदरम्यान मानवी हक्कांचे उल्लंघन होणार नाही याबाबत शाश्वती निर्माण होणार आहे.”
याबाबत बोलताना आझाद पुढे म्हणाले, “आपली सैन्यदले आपलं आयुष्य पणाला लावून देशाची रक्षा करत आहेत मात्र जर काही जणांकडून केवळ बढती अथवा बक्षिसासाठी एखाद्या निष्पापाचा बळी घेतला जात असेल तर अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे.”
यावेळी आझाद यांनी आर्टिकल ३७० बाबत बोलताना सांगितले की, “आर्टिकल ३७० हे गेल्या ७० वर्षांपासून जम्मू काश्मिरात लागू असून ते या पुढे देखील लागू राहील.”