मुंबई – करोना साथीच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे अधिवेशन पाच आणि सहा जुलै असे दोन दिवस घेण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मराठा आणि ओबीसी आरक्षण आदी महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी हे अधिवेशन किमान दोन दिवस असावे, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत होती.
विधिमंडळाच्या या अधिवेशनाच्या कामकाजातून प्रश्नोत्तर, तारांकित प्रश्न आणि लक्षवेधी हे प्रकार वगळण्यात आले आहेत. करोनाची दुसरी लाट ओसरत आहे. त्यामुळे विरोधकांकडून मराठा आणि ओबीसी आरक्षणावर चर्चा करण्यासाठी स्वतंत्र अधिवेशन घेण्याची तसेच चार दिवसांचे विधिमंडळ अधिवेशन घेण्याची मागणी केली जात होती.
विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची आज विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासंदर्भात बैठक झाली. यात पुढील महिन्यात म्हणजे पाच आणि सहा जुलै असे दोन दिवसांचे पावसाळी अधिवेशन घेण्याचा निर्णय घेतला. हे अधिवेशन दोन दिवसांचे घेण्याच्या निर्णयाविरोधात भाजपाने बैठकीतून सभात्याग केला.
करोनाचा आजार गंभीर आहे. त्याबद्दल सर्व प्रकारची काळजी घेतली पाहिजे. आम्हीही सरकारला मदत करतोय. पण, करोनाचा बहाणा करून अधिवेशन घ्यायचे नाही, असा प्रयत्न सरकार करत असल्याचे आमच्या लक्षात आले आहे. त्यामुळे कामकाज समितीतून आम्ही बाहेर पडलो आहे, असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला.