असे म्हणतात, इतरांच्या आयुष्यासाठी हिताच्या गोष्टी या दिल्याने वाढतात. मग त्यात अनेक गोष्टी येतात. ज्ञान, धन आणि प्रेम या गोष्टी आहेत ज्या आपण इतरांना दिल्याने नक्कीच वाढतात. मुळात मानवी जीवनात देण्याच्या भावनेला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे.
दानशूरतेबाबत सांगताना अज्ञात कवीने म्हटले आहे की,
सढळ हाताने। दान हे करावे।
दीनास तारावे। प्रेमभावे।।
यात दीन व्यक्ती म्हणजे केवळ संपत्तीने दीन असणे असा होत नाही. कोणी प्रेमाचा भुकेला, कोणी मायेचा भुकेला तर कोणी ज्ञानाचा भुकेला असतो. अशा वेळी अशा गरजूंना त्यांना हवे ते देणे म्हणजेही दानच आहे.
दानशूरपणाबाबत आपण महाभारतातील कर्णाचे नाव सातत्याने घेतो. कर्णासारखा दानशूर आजपर्यंत कोणी झालेला नाही, असे आपण नेहमी म्हणतो. पण जेव्हा आपल्याकडे असणारी गोष्ट इतरांना द्यायची म्हटली की आपल्याला कर्णाच्या दानशूर स्वभावाचा विसर पडतो. प्रत्येकाकडे काही ना काही देण्यासारखे असते. परंतु ती देण्याची दानत त्यांच्याकडे असावी लागते. पुर्वी दान ही व्याख्या जरा संकुचित होती. ज्यात फक्त अन्न, धन, धान्य, संपत्ती, गोधन यांना दानाच्या गोष्टी मानल्या जायच्या. यासाठी या सर्व गोष्टींनी सधन असावे लागायचे. मात्र आता आधुनिक युगात ही व्याख्या बदलली आहे. मानवी जीवनात योगदान देणाऱ्या अनेक गोष्टी, संकल्पना या दान करता येऊ लागल्या आहेत.
अवयवदान,ज्ञानदान, मूलभूत गरजांचे दान, आपद्ग्रस्तांना मदत आणि इतर अनेक गोष्टी यात केल्या जातात. परंतु बदलत्या वेळेप्रमाणे या दानाचा उद्देशही बदलत चालला आहे. प्रसिद्धीच्या वलयात येण्यासाठी, करसवलतीसाठी आणि स्वतःच्या स्वार्थासाठी देण्याचा दिंडोरा पिटला जातो. हजारोंची मदत करून त्यांच्या प्रसिद्धीसाठी लाखो खर्चले जातात. सोशल मीडिया,फ्लेक्स, माहितीपत्रके आणि भित्तीपत्रकांच्या माध्यमातून समाजसेवेचे नसते अवसान आणले जाते. त्यामुळे ही देण्याची भावना कितपत सढळ आणि निःस्वार्थी आहे हे ओळखणे तसे कठीणच.
देणे ही केवळ भावनाच नाही तर देणे ही एक कला देखील आहे. आपण आर्ट ऑफ लिव्हिंग मधून जसे जगण्याची कला शिकतो. तसेच आर्ट ऑफ गिव्हिंगमधून देण्याची कला शिकायला हवी. यासाठी आपण दिलेल्या दानाचा सदुपयोग होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. ज्या व्यक्तीला दान करतो तो त्यास पात्र असायला हवा. त्यातून त्याच्या आयुष्यात बदल घडायला हवा. अन्यथा आळशी माणसाच्या खाण्यापिण्याची आयती व्यवस्था करणे म्हणजे त्याला अधिकच आळशी बनविण्यासारखे आहे.
भुकेल्यांना एक भाकरी दिली तर त्याची तात्पुरती भूक भागते. परंतु त्याच भुकेल्याला भाकरी बनविण्याची आणि त्यासाठी कष्ट करण्याची कला दिली तर तो कधीही उपाशी राहत नाही. हे आहे आर्ट ऑफ गिव्हिंग. परंतु भाकरी देऊन केवळ तात्पुरती वेळ मारून नेण्याची मानसिकता समाजात आजही जिवंत आहे हेच या समाजाचे दुर्दैव. बालदिनाच्या दिवशी पुणे शहरातून दुचाकीवरून चाललो होतो. एका चौकात मी सिग्नल लागला म्हणून गाडी थांबविली. माझ्याशेजारी एका दुचाकीवर एक सुशिक्षित जोडपे आपल्या लहान मुलासह बसले होते.
सिग्नल लागताच एक सात आठ वर्षांचा फुगे विकणारा मुलगा फुगे घेऊन आला. त्या दुचाकीवरील मुलाने आपल्या बाबांना फुगे घेण्याचा हट्ट धरला. त्या मुलाच्या बाबांनी त्या फुगेवाल्या मुलाला बोलवून फुगा घेतला. त्या फुगेवाल्याला विचारले किती रुपये? तो बोलला, साहेब वीस रुपये तो दुचाकीस्वार बोलला, अरे दहा रुपये घे गपचूप. त्यावर त्याची पत्नी बोलली, अहो जाऊ द्या वीस रुपये आज बालदिन आहे ना तो पण लहानच आहे की. त्या मुलाच्या हातावर वीस रुपये टेकवत ती व्यक्ती बोलला, हे घे ऐश कर.
त्यानंतर त्या रस्त्यावरील मुलाला मोठी मदत केल्याच्या अविर्भावात ते जोडपे निघून गेले. मला प्रश्न पडला त्या वीस रुपयांचे तो मुलगा (अधिकृत बालकामगार?) काय करणार? त्याने त्याच्या आयुष्यात काय बदल घडणार? त्या वीस रुपड्यात नक्की तो काय ऐश करणार? उत्तर सरळ होते तो पुन्हा हेच काम करीत राहणार. ज्यातून त्याच्याकडे पैसे येणार त्याच्या तात्पुरत्या गरजाही भागणार. परंतु भविष्याचे काय? पुनश्चः अनुत्तरीत.
आपल्याला इतरांना असे काही देता आले पाहिजे जे त्यांच्या उज्ज्वल भविष्याची शिदोरी ठरेल. त्यातून त्यांचा उद्धार होईल. अनेकदा आपण इतरांना दिलेले चार उपदेशाचे डोस हे चार लाखांच्या मदतीपेक्षाही मोलाचे ठरतात. आत्मविश्वासाचे पाठबळ नवी भरारी घेण्याचे बळ देते. आणि त्यानंतर त्या व्यक्तीच्या प्रगतीत आपले योगदान अमूल्य ठरते. एखादे झाड लावल्याने ते लावल्याचा क्षणिक आनंद मिळतो, परंतु त्या झाडाचे संवर्धन केल्याने खरे समाधान मिळते. ते झाडही आपल्याला भरभरून देऊ लागते. चला तर मग आर्ट ऑफ गिव्हिंग आत्मसात करून समाजाचे ऋण फेडू या.
सागर ननावरे