मुंबई : देहूमध्ये काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलेल्या संत तुकाराम यांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषणाची संधी न दिल्याच्या मुद्द्यावरुन आता राज्यातील राजकारण ढवळून निघत आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रावर निशाणा साधल्यानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करण्यासाठी परवानगी नाकारण्यात आली. हा संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान असून हा प्रकार गंभीर आणि वेदना देणारा आहे, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला होता. दरम्यान,सुप्रिया सुळे यांच्यानंतर आता रोहित पवार यांनी ट्विटरवरुन आपली नाराजी व्यक्त केली आहे.
“छत्रपतींचा तसेच क्रांतीज्योतींचा अपमान करणाऱ्या राज्यपालांना पंतप्रधान साहेबांसमोर खडे बोल सुनावणाऱ्या अजितदादांच्या स्पष्टवक्तेपणामुळे भाजपची नक्कीच अडचण होत असणार म्हणून कदाचित भाजपने आजच्या कार्यक्रमात अजित पवारांना बोलू दिले नाही,” असे रोहित यांनी पहिल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
तर दुसऱ्या ट्विटमध्ये रोहित यांनी, “वारकऱ्यांच्या कार्यक्रमात सर्व भेद, द्वेष, अहंकार विसरून सहभागी व्हायचे असते. परंतु अहंकाराच्या आहारी गेलेल्या प्रदेश भाजपच्या नेत्यांकडून ही अपेक्षा करणे व्यर्थ आहे. अहंकाराबद्दल संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात अहंकार हा आत्मनाश घडवितो, माणसाला सत्यापर्यंत पोचू देत नाही,” अशी महाराष्ट्र भाजपावर टीका केली.
तिसऱ्या ट्विटमध्ये रोहित यांनी, “अहंकारी मनुष्य ‘आपण मोठे आहोत’ अशी भावना डोक्यात धरून गुरगुरत राहतो आणि असंच काहीसं आज प्रदेश भाजपा नेत्यांचं झालं असावं. असो संत तुकोबारायांच्या दर्शनाने नक्कीच सर्वांना सद्बुद्धी प्राप्त होईल, अशी अपेक्षा,” असं म्हणत भाजपवर निशाणा साधला आहे.