करोनामुळे गिऱ्हाईक कमी : भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत स्थिर
पुणे(प्रतिनिधी) – आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर रताळीला मोठी मागणी असते. मात्र, यावर्षी करोना संसर्गाचा फटका मार्केट यार्डातील तरकारी विभागातून होणाऱ्या रताळीच्या विक्रीला बसला आहे. बाहेरगावाहून खरेदीदार आलेले नसून, कंटनमेंट झोन आणि किरकोळ बाजार बंद असल्याने नेहमीच्या तुलनेत रताळीला कमी मागणी आहे. आवकही गेल्या वर्षीच्या तुलनेत 20 टक्क्यांनी घटली असल्याची माहिती व्यापारी अमोल घुले यांनी दिली.
बुधवारी (दि.1 जुलै) आषाढी एकादशी आहे. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी मार्केट यार्डातील तरकारी विभागात रताळांची आवक सुरू झाली आहे. घाऊक बाजारात कर्नाटक रताळांना प्रती दहा किलोस 180 ते 200 रुपये, तर करमाळा भागातील रताळांना दहा किलोस 300 ते 350 रुपये भाव मिळत आहे. दोन्ही रताळांचे भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत स्थिर आहेत.
घुले म्हणाले, नवरात्रोत्सवोत्सवासह आषाढी एकादशी, गोकुळ अष्टमी, महाशिवरात्र, कार्तिकी एकादशी या दिवशी बहुतांश लोक उपवास करत असतात. त्यामुळे या काळात उपवासासाठी रताळीला जास्त मागणी असते. आता आषाढी एकादशी अवघ्या दोन दिवसांवर आली आहे. त्यामुळे बाजारात रताळांची आवक झाली आहे.
दीड एकर शेतामध्ये रताळीची लागवड केली आहे. चांगल्या झालेल्या पाऊसामुळे यंदा रताळीचे उत्पादन चांगले झाले आहे. सध्या करोना संसर्गाची परिस्थिती असून, यामध्ये मिळणारा भाव समाधानकारक आहे.
-नागनाथ जगन्नाथ पाटील(शेतकरी, रा. मांजरगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर)
पुणे विभागातून विशेषत: सोलापूर, करमाळा भागातून सुमारे 1300 पोतींची आवक झाली आहे. ही रताळ गावरान आणि आकाराने लहान असतात. त्याची चव गोड असते. त्यामुळे या रताळांना नागरिकांकडून मोठी मागणी असते. परिणामी, भाव जास्त असतो. तर, दुसरीकडे कर्नाटक रताळी आकाराने मोठी आणि तुरट असतात. त्यामुळे त्यांना तुलनेने मागणी कमी असते. कर्नाटकातून 300 पोती रताळांची आवक झाली आहे.