पुणे – उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कामावर परतणाऱ्या एसटी कर्माचाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. यातील बहुतेकजण रुजू झाले आहेत. यामुळे काही महिन्यांपासून विस्कळीत झालेली एसटी सेवा पूर्ववत झाली आहे. राज्यातील ग्रामीण भागात देखील आज पुन्हा एसटी बस धावू लागली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना सुखद दिलासा मिळाला आहे.
लालपरीतून खूप दिवसांनी प्रवास करायला मिळणार हा क्षणच वेगळा असल्याचे काहींनी सांगितलं आहे. ग्रामीण भागांत आज कित्येक महिन्यांनी लालपरी गेली आहे. अनेक महिला कर्मचारी पुन्हा ड्युटीवर जॉईन करताना भावनिक होत असल्याचे दिसून येत आहे. सोशल माध्यमांवर देखील या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे.
त्यामुळेच का होईना… एसटी हा विषय सर्वसामान्यांच्या अतिशय जवळचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून एसटीचे चाक आगारातच रुतेल होते. मात्र, आज एसटीने पुन्हा एकदा धाव घेतली असल्याचे पाहायला मिळत आहे. ग्रामीण भागात एसटी आगारातील 95 टक्के कामगार कामावर रुजू झाले असून, लालपरीच्या चाकांची पुन्हा वेग धरला आहे.
दरम्यान, आता लांब पल्ल्याच्या गाड्या देखील पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आले आहेत. इंदापूर ,वालचंदनगर भिगवण, दौंड, नीरा, फलटण, जेजुरी शटल तर अहमदनगर, नाशिक, औरंगाबाद, शिर्डी, श्रीरामपूर, मोहटादेवी,रावेर ,औसा, बार्शी, नांदेड, अक्कलकोट ,सोलापूर, हैदराबाद, पंढरपूर, तुळजापूर, मंगळवेढा, सांगोला, जत, आटपाडी, आदी लांब पल्ल्याया गाड्या सुरू झाल्या आहेत.