आंबेगाव – तालुक्यातील वीज ग्राहकांना वीजबिले वेळेवर मिळत नसल्याने मोठा भुर्दंड बसत आहे. बिलाअभावी वीजबिल भरता येत नाही. वीज वितरण कंपनीचे कर्मचारी वीज पुरवठा खंडित करण्यासाठी येतात. महावितरणच्या मनमानी कारभाराचा त्रास वीज ग्राहकांना सहन करावा लागत आहे.
वीजवितरण कंपनीने वेळेत वीजबिले ग्राहकांना देण्यासाठी कार्यवाही करावी. वीज ग्राहकांना वीज बिल हे नेहमी अंतिम देयक दिनांकानंतर येत आहेत. परिणामी वेळेत बिल घरी न आल्याने ग्राहकांना वारंवार अतिरिक्त दंड भरावा लागतो. वीज वितरण कंपनीकडून त्यांच्या तक्रारीची दखलही घेतली जात नाही. यामुळे वीज ग्राहक त्रस्त आहेत. वीज वितरण कंपनीकडून देण्यात येणाऱ्या वीज बिलावर देयक दिनांक टाकण्यात येतो. हा देयक दिनांक म्हणजे ज्या वेळी वीजबिल सिस्टीममध्ये तयार होते. ती तारीख असते.
साधारण या तारखेच्या दहा दिवसांमध्ये ग्राहकांच्या घरी वीज बिल येणे अपेक्षित असते. अंतिम देयक दिनांकापासून बिल भरण्याची अंतिम तारीख घरगुती, व्यापारी आणि औद्योगिक ग्राहकांसाठी वेगवेगळी असते; परंतु तोपर्यंतही अनेक ग्राहकांकडे वीज बिल पोहोचत नसल्याने ग्राहकांना दंडाची रक्कम भरावी लागते. दंडाची रक्कम वीज देयकाच्या रकमेवरून ठरते. दहा रुपयांपासून पुढे कित्येक रुपये दंड आकारला जातो. परिणामी वीज बिल वितरक ठेकेदाराने घरी वीज बिल उशिरा आणल्याने कोणतीही चूक नसताना वीजग्राहकास दंडाचा भुर्दंड सोसावा लागत आहे. महावितरण कंपनीने वीजबिल वितरित करण्यासाठी ठेकेदारांची नेमणूक केली आहे.
अनेक वेळा ठेकेदार उशिरा बिले देतो. तर काही वेळा वीजबिल वाटण्यास उशीर झाल्याने ग्राहकांकडे वीज बिल उशिरा पोहोचते. वाडीवस्तीवर वीज बिल वेळेत पोहोचत नाहीत. बहुतांश ठिकाणी ठेकेदार उपलब्ध होत नाही. असे प्रकार वारंवार होत असल्याने ग्राहकांमध्ये वीज वितरण कंपनीबाबत प्रचंड राग व असंतोष निर्माण झाला आहे. विजबिल मुदतीनंतर भरल्यावर विनाकारण अतिरिक्त दंड भरावा लागतो.
मंचर व परिसरात सुमारे 10 हजार ग्राहक आहेत. मात्र बहुतेक वीज ग्राहकांना बिले वेळेत मिळत नाही. तक्रार केली की अधिकारी पहिले बिल भरा, मग पाहू असे सांगतात. हा ग्राहकांवर अन्याय आहे. वीज ग्राहकांना आर्थिक फटका बसतो. अनेक महिने बिले आली नाहीत. अशी तक्रार केली की, अधिकारी ऑनलाइन बिल काढा. अथवा ऑफिसला येऊन घेऊन जा, असे सांगतात. मग ग्राहकांना बिलासाठी हेलपाटे मारावे लागतात.